आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दूषित पाणी, उघड्यावरील अन्नाचे सेवन करणे, यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. दूषित अन्नामुळे पोटात संसर्ग आणि विषबाधा होते. घरातील जवेन तसेच बाहेरच्या जेवणातून अशा प्रकारची विषबाधा होऊ शकते. परंतु, बाहेरच्या अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त असते. खराब किंवा शिळे अन्न सेवन केल्यास तासाभरात पोटात दुखणे, अतिसार, उलटी आदी त्रास सुरू होताात. काहीवेळा ही लक्षणे १० दिवसानंतरही दिसून येऊ शकतात.
केमिकलयुक्त किंवा विषाक्त अन्नाचे सेवन केल्यानंतर उलटी, अतिसार, घाम येणे, डोळ्यातून पाणी येणे, जास्त थुंकी येणे, पोट दुखणे, डोके गरगरणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जर समस्या प्राथमिक स्वरूपाची असेल तर घरच्या घरीच उपचार करता येतात. मात्र, रूग्णाची प्रकृती अत्यावस्थ असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
अन्न विषबाधेची लक्षणे आढळून आल्यास भरपूर पाणी प्यावे. अशावेळी दारू, कॅफीन किंवा साखरयुक्त पेय पदार्थ घेऊ नयेत. इलेक्ट्रोल पाणी प्यावे. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही. पोट खराब झाले असेल तर काळा चहा प्यावा. एक चमचा मेथी दाणे, पाणी आणि ताक मिसळून पेय तयार करून ते प्यावे. यामुळे आराम पडतो. तापासोबत शौचातून रक्त येणे, वारंवार उलटी, शरीरातील पाणी कमी होणे, हा त्रास तीन दिवसांपेक्षा जास्त काळ जाणवत असल्यास डॉक्टरांना दाखवावे. जर तोंड सुकत असेल, यूरिन कमी येत असेल, चक्कर, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.
अन्न विषबाधा टाळण्यासाठी पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे. उघडे व वास येणारे अन्न सेवन करू नये. एक्स्पायरी डेट संपलेले डबाबंद जेवण खाऊ नये. जेवण केल्यानंतर लगेच शिल्लक राहिलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवावे. हिरव्या भाज्या शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात, ही काळजी घेतल्यास अन्न विषबाधा टाळता येऊ शकते.