आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सर्वचजण पावसाळ्याची मोठ्या आतुरतेने वाट पहात असतात. यामागील कारण असते ते कडक उन्हाळ्याचे. कारण, कडक उन्हामुळे सर्वचजण हैराण झालेले असतात. बाहेर पडणे देखील अवघड होऊन बसते. अशावेळी जूनमध्ये पाऊस सुरू होईल आणि उष्णतेपासून सुटका होईल, अशी वाट सर्वजण बघत असतात. यामुळे हवाहवासा वाटणारा पाऊस जेव्हा प्रत्यक्षात सुरू होतो तेव्हा अल्हाददायक थंड हवामानाने सर्वजण सुखावतात. तर दुसरीकडे पावसाचे पाण आणि आद्रतेमुळे विविध आजारांचे प्रमाणही वाढते. शिवाय, व्यायाम आणि आहाराचे वेळापत्रकही कोलमडते. यासाठी पावसाळ्यात फिटनेसकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता खूप जास्त असते.
कितीही अडचणी आल्या तरी पावसाळ्यात फिटनेसशी तडजोड करू नये. व्यायाम करण्याचादेखील कंटाळा करू नये. पावसाळ्यात अरोग्य चांगले ठेवण्यासाठी नेहमी उकळलेले पाणी प्यावे. जर कमी तहान लागत असेल तर पाण्यात दालचिनी, सुंठ किंवा कॅमोमाइल फ्लेव्हर मिसळावा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. पावसाळ्यात शिजवलेल्या भाज्या खाव्यात. आहारात लसूण व आले यांचा जास्त वापर करावा; यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. संधिवाताचा त्रास असणारांनी सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची पाने आणि दालचिनी टाकून पाणी कोमट करून प्यावे. पावसाळ्यात फळांचा रस पिऊ नये. कोणतेही फळ पूर्ण खावे. कारण अर्धे फळ खाऊन ठेवल्यास ते दूषित होऊ शकते.