आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केवळ शरीर शुद्ध असून चालत नाही तर मनसुद्धा निरोगी असेण खूप आवश्यक आहे. ज्याचे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध तोच खरा आरोग्यदायी जीवन जगू शकतो. यासाठी शाकाहार हा उत्तम पर्याय आहे. मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती अहिंसक असून त्याच्यावरील मूळ संस्कार दया, शांती, शीतलता आणि क्षमाशीलता हे आहेत. असे म्हटले जाते की, सध्या सर्वत्र दिसून येणारी अशांतता, चिंता, भय, दु:ख, हिंसाचार याचे मुख्य कारण मनुष्याचे अशुद्ध खाणे-पिणेच आहे.
मांसाहार टाळणेच योग्य
मनुष्य जेव्हा स्वार्थासाठी प्राण्यांची कत्तल करतो तेव्हा प्राण्यांचे ओरडणे, दु:ख या सर्व नकारात्मक भावनांचे कंपन त्यांच्या मांसातून तयार केलेल्या पदार्थांमध्ये उतरते. आरोग्यदायी व्यक्ती तीच असू शकते ज्याचे शरीर आणि मन शुद्ध आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या जीवनातील तीन मूलभूत गरजा आहेत. त्यात अन्न ही अत्यंत आवश्यक अशी गरज असली तरी आपण जगण्यासाठी खातो की, खाण्यासाठी जगतो हा विचार करण्याची गरज आहे.
शाकाहारी हत्ती सर्वाधिक शक्तीशाली
जेवणात जर मांसाहार नसेल तर शरीरात प्रोटीनचे प्रमाण कमी होते, यामुळे शरीर कमकुवत होते, असा एक गैरसमज आहे. परंतु, प्राण्यांचे जीवन पाहिले तर पुष्कळशी तथ्ये समोर येतात. असे अनेक प्राणी आहेत जे शाकाहारी असूनही अत्यंत शक्तिशाली आहेत. यात सगळ्यात मोठे उदाहरण हत्तीचे देता येईल. पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या कल्पनांना बाजूला सारून सत्याचा स्वीकार केला पाहिजे.
मनाला विचारा, अन्न शुद्ध आहे का?
सत्याचा विचार केला तर आध्यात्मिक संवेदना जागृत होतात. ज्यामुळे आचार-विचारांमध्ये सकारात्मक परिवर्तन होऊ शकते. ही नवजागृत संवेदनशीलता शरीर व त्यात निवास करणारा आत्मा दोघांसाठी एक विशाल दृष्टी प्रदान करते. आणि सूक्ष्म मन हा निर्णय घेण्यास सक्षम होते की, आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते आपले शरीर व आपल्या मनासाठी आरोग्यवर्धक आहे की नाही ?