आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वयानुसार कोणता व्यायाम करावा, याची माहिती अनेकांना नसते. वयानुसार होणारा शरीराचा विकास आणि हार्मोनल बदलानुसार व्यायामात बदल करणे गरजेचा आहे, असे तज्ज्ञ सांगतात. वयानुसार व्यायाम न केल्यास फायदा होत नाही. तरूणांनी आणि प्रौढांनीच व्यायाम करावा, असा समज बहुतांश लोकांचा असतो. मात्र, व्यायामाची गरज अगदी दोन वर्षांच्या मुलांनाही असते. त्यामुळे व्यायाम हा सर्व वयोगटासाठी गरजेचा आहे. कोणत्या वयोमानानुसार कोणता व्यायाम करावा याविषयी आपण जाणून घेणार आहोत.२ ते ५ या वयात मुलांचा विकास जलदगतीने होत असतो. याच काळात मुले शरीराचा तोल सांभाळतात. गुडघ्यावर चालणारी मुले शारीरिक हालचालीदरम्यान स्नायूंच्या समूहाचा सर्वाधिक उपयोग करतात, असे मेरीलँड विद्यापीठाच्या कायनेसिओलॉजी विभागाच्या एका संशोधनात म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते लहान मुलांना स्वाभाविकरीत्या धावणे, उड्या मारणे किंवा कुठेही चढण्याचा प्रयत्न करणे या सवयी असतात. अशावेळी मुलांना सक्रिय ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे. कारण तोच त्यांचा व्यायाम असतो. आई-वडिलांनी मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास त्यांचा चांगला व्यायाम होऊ शकतो.
तसेच ५ ते ८ या वयोगटातील मुलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात आणि शरीराचा वेगाने विकास होत असतो. किशोरावस्थेपर्यंत मुलांची उंची दरवर्षी सरासरी ९ सेंटीमीटर आणि मुलींची उंची ८ सेंटीमीटर वाढत असते. १२-१३ वर्षे वयापासून मुलींचा विकास सुरू होतो. तो वयाच्या १८ वर्षांपर्यंत पूर्ण होतो. मुलांचा विकास पूर्ण होण्यास दोन वर्षे अधिक लागतात. म्हणजेच त्यांचा विकास २० वर्षांपर्यंत पूर्ण होतो. या वयात व्यायाम केल्याने शरीराचा नैसर्गिक विकास वेगाने होतो आणि चरबी वाढत नाही. ५ ते १० वर्षे वयामध्ये हाडांचा पूर्ण विकास होत नाही. अशावेळी वजन उचलण्याचा व्यायाम करू नये. उलट धावणे, पोहणे आणि सायकल चालवण्यासारखा सोपा व्यायाम करावा. शाळेतही खेळण्यात सहभागी व्हावे.
१८ ते ३० या वयात शरीराचे योग्य वजन कायम ठेवण्यासाठी हा वयोगट उपयुक्त ठरतो. या वयात मेटाबॉलिक रेट तीव्र असतो. त्यामुळेच शारीरिक हालचालीदरम्यानच नव्हे, तर विश्रांतर करतानाही कॅलरी जळते. २५ ते ३५ वर्षे वयात स्नायू बळकट होतात. एरोबिक्स, धावणे, पोहणे, तीव्र गतीने चालणे आणि सायकल चालवणे फायदेशीर ठरेल. तसेच स्नायूंमध्ये लवचीकता कायम ठेवण्यासाठी योगासने फायदेशीर आहेत. ३० ते ४० वयात सक्रिय नसल्यास किंवा जास्त करून बैठे काम करत असाल तर दरवर्षी स्नायूंचे एक ते दोन टक्के नुकसान होते. एवढेच नव्हे तर या कालावधीत पीयूष ग्रंथीने सक्रिय होणारी ग्रोथ हार्मोनची पातळीही कमी होते. हा हार्मोन स्नायू आणि हाडे बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. या हार्मोनची पातळी कमी असल्याने दुखापतग्रस्त स्नायू बरे होण्यास वेळ लागतो. जड वस्तू उचलण्याचा व्यायाम आणि एरोबिक्सच्या मदतीने शरीर सडपातळ होते. तर ४० ते ४५ वर्षे या वयात साधारणत: महिला रजोनिवृत्तीतून जातात. यामुळे प्रत्येक वर्षी त्यांच्या हाडांची एक टक्के हानी होते. यावेळी हार्मोनल बदलांमुळे वजन वाढण्याचीही समस्या उद्भवते. अशावेळी महिलांना सडपातळ राहणे कठीण जाते. अशा स्थितीत नियमित व्यायाम केला पाहिजे.