आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जास्त काम, अवेळी जेवण, अपूर्ण झोप यामुळे शरीराच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होत असतो. तसेच यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो. हा त्रास टाळायचा असेल तर आहाराकडे विशेष लक्ष देणे खूप गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून सेवन करावे. तसेच शुद्ध तुपात कांदा भाजून त्याचे सेवन करावे. हा उपाय नियमित केल्यास अशक्तपणा दूर होतो. शिवाय फुप्फुसांनाही बळकटी येते.
गाजरात भरपूर पोषक द्रव्ये असतात. गाजराचा रस प्यायल्यास शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळू शकते. अशक्तपणा दूर करायचा असेल तर दीर्घ काळापर्यंत उपाशी राहू नये. प्रत्येक दोन ते तीन तासांच्या अंतराने थोडे-थोड जेवण करत राहावे. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. जेवणानंतर लगेचच झोपू नये. यामुळे जास्त आळस येतो. लिंबू आणि मोसंबीचा ज्यूस अशक्तपणा दूर करतो. यातील अँटिऑक्सिडंट्स प्रतिकारशक्ती बळकट बनवतात. म्हणून अशक्तपणा दूर करण्यासाठी हे ज्यूस नियमित घ्यावेत.
दिवसभर ऊर्जा पातळी राखण्यासाठी मोड आलेले मूग आणि हरभरे यांचे सेवन करावे. यामुळे थकवा दूर होतो. कामाच्या अधिक व्यापामुळे वेळेवर जेवण होत नसल्याने काही जण जंक फूडचे सेवन करतात; परंतु जंक फूड धोकादायक असून ते खाण्याचे टाळावे. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायूंना जास्त मेहनत करावी लागते. यामुळे व्यक्ती लवकर थकते.