आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आजही भारताच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. एखाद्या गंभीर आजाराने पीडित व्यक्तीची यामुळे सहसा होलपट होते. नांदेडमधील अकरा वर्षीय संदेशला असाच अनुभव आला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास कोणतेही स्थानिक डॉक्टर तयार नव्हते. परंतु, त्याचे नशीब बलवत्तर होते. नांदेडमध्ये नानावटी रूग्णालयाने आयोजित कॅम्पमध्ये तो गेल्यानंतर तपासणी आणि पुढील अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेची त्याची वाट मोकळी झाली. त्याला असलेला हृदयदोष हा अतिशय दुर्मिळ होता. मात्र, नानावटीच्या डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून या मुलास त्रासमुक्त केले आहे.
संदेशला लहानपणापासून श्वास घेण्यात अडचण येत होती. तसेच त्याच्या छातीत वेदनाही हात होत्या. हा त्रास असल्याने त्याला घेवून आई-वडिल अनेक डॉक्टरांकडे जात होते. वरवरचे इलाज केले जात होते. पण, नेमके निदान होत नव्हते. अखेर त्यास नांदेडमधील एका कार्डिओलॉजिस्टकडे दाखवले असता त्यास सुपरोवॅल्वर एओर्टिक स्टेनोसिस हा दुर्मिळ हृदयदोष असल्याचे सांगण्यात आले. हे ऐकूण त्याचे पालकही घाबरले होते. त्यांनी पुन्हा अनेक रुग्णालये, सेंटर्समध्ये जाऊन त्याची तपासणी केली. मात्र अत्यंत गुंतागुंतीची आणि धोकादायक असलेली ही शस्त्रक्रिया करण्यासाठी कुणीही नव्हते.
त्याच्या पालकांची ही धावपळ सुरू असतानाच मुंबईतील नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत हार्ट कॅम्प आयोजित केले होते. संदेशच्या पालकांनी त्याला या शिबिरात आणले आणि त्याच्या पालकांना पुढील मार्ग दिसू लागला. या शिबिरात काही तपासण्या केल्यानंतर संदेशला शस्त्रक्रियेसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात पाठवण्यात आले. ७ मे, २०१९ रोजी संदेशवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आठवडाभरात संदेशच्या प्रकृतीत सुधारणा झाली. १४ मे, २०१९ रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मुलास जीवदान मिळाल्याने संदेशच्या वडीलांना आनंद झाला आहे. ते म्हणाले, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याला नवीन आयुष्य मिळाले आहे. मी डॉक्टरांचे खूप आभार मानतो.
संदेशवर करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या आणि धोका असलेल्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देताना सर्जन डॉ. रोहित शहापूरकर यांनी सांगितले की, या रुग्णाच्या एओर्टाचे २ भाग केले आणि रक्तवाहिनीचा संकुचित झालेला भाग हाताळण्यात आला. पेरिकार्डियम म्हणजे हृदयावरील आवरणापासून ३ पॅचेस बनवण्यात आले आणि त्याचा वापर रक्तवाहिनीचा आकार वाढवण्यासाठी करण्यात आला. याला त्रिपल पॅच टेक्निक म्हणतात. ही शस्त्रक्रिया कठिण असली तरी उत्तम आहे.
तर कन्सलटंट कार्डिओव्हस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ. रोहित शहापूरकर म्हणाले, संदेशच्या हृदयातील महाधमनी (एओर्टा) म्हणजे शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी आणि हृदयाच्या सुरुवातीला असणारी रक्तवाहिनीचा आकार कमी झाला होता, ती अरुंद होती. या स्थितीला सुपरोवॅल्वर एओर्टिक स्टेनोसिस म्हणतात. ही जन्मजात असलेली हृदयाची दुर्मिळ अशी समस्या आहे. यावर उपचार करणेही कठीण असते. ही समस्या दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया गरजेची असते.