आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने १ हजार ३२ औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. त्याचबरोबर जनऔषधी स्टोअर्सना ७०० विविध प्रकारची औषधेही पुरवली जाणार आहेत. यामुळे औषध कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसून गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध होणार आहेत.
आपल्याकडे चढ्या किमतीत ब्रॅण्डेड औषधे विकली जातात. ती रुग्णांना परवडणारी नसतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवर नियमित आणि दीर्घकालीन औषधे घ्यावी लागतात. कर्करोग आणि इतर आजारासंबंधीच्या ४२ औषधांचे व्यापारी मार्जिन निश्चित केल्याने औषधांच्या किमती ९० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत.
काल शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील संसदेत औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. किंमत कमी केल्यामुळे यातील मार्जिन देखील घटणार असल्याने आणि ते निश्चित असल्याने याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. यामुळे सतत औषधांचे सेवन करणाऱ्या रुग्णाला याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे.