आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आइस्क्रीम, थंडपेय यांच्यामुळे शरीराला थंडावा मिळत नाही, उलट नुकसानच होते. यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार होतात. म्हणून आइस्क्रीम खाण्यापेक्षा शरीराला नैसर्गिक थंडावा देणारे पदार्थ सेवन केले पाहिजेत. हे नैसर्गिक पदार्थ कोणते, याविषयी माहिती घेवूयात.
गुलकंद व मनुका
गुलकंद हा औषधी गुलाब व खडीसाखर यांच्या साहाय्याने तयार केला जातो. याच्या सेवनाने शरीरात वाढलेली उष्णता कमी होते. शरीरामध्ये कोणत्याही स्वरूपाची जळजळ होत असल्यास गुलकंद खाल्ल्याने उपयोग होतो. द्राक्षापासून बनवलेला मनुकादेखील उत्तम आहे.
मोरावळा
आवळा हे फळ हिवाळ्यात उपलब्ध होते. त्यापासून मोरावळा तयार केला जातो. मोरावळा शरीराला नैसर्गिक थंडावा देतो. घसा आणि छातीमधील जळजळ, आम्लपित्ताची डोकेदुखी यासारख्या अनेक तक्रारी मोरावळा गुणकारी आहे.
नारळपाणी लिंबुपाणी, कोकम घ्या
कृत्रिम शीतपेयांनी शरीरावर दुष्परिणाम होतो. याऐवजी नारळाचे पाणी, लिंबाचे सरबत, कोकमचे सरबत, आवळ्याचे सरबत गुलाब जल, द्राक्षाचा रस, या द्रव पदार्थांचा उपयोग करावा.
काकडी
काकडीच्या सेवनाने मूत्रमार्गाची जळजळ, तसेच उष्णतेचे इतर विकार कमी होतात. हातापायांची, डोळ्यांची आग होत असल्यास काकडी, साखर व ओले खोबरे हे मिश्रण खावे. दम्याच्या रुग्णांनी, तसेच सर्दी खोकला वारंवार होत असल्यास काकडीचे सेवन टाळावे.