आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे. हा महिना हिंदू धर्मात खूप पवित्र महिना मानला जातो आणि आज आपल्याकडे या महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात अनेकजण उपवास करतात. उपवास हा आपल्या आरोग्यासाठी जेवढा चांगला आहे. तेवढाच वाईटही आहे. त्यामुळे आपण जर या महिन्यात उपवास करता असाल तर उपवास कसा करायचा, उपवास करत असताना काय खायच आणि कोणती काळजी घ्यायची जेणेकरून आपला उपवास चांगला होईल. व आपल्या आरोग्याची हेळसांडही होणार नाही. हे आपण आज जाणून घेणार आहोत.
उपवासाला या पदार्थांचा आहारात समावेश करा
१) २-३ राजगिरा लाडू व एक ग्लास सुंठ-हळदीचे बिनसाखरेचे दुध
२) श्रावण महिन्यात तुम्ही जर उपवास करत असाल तर केळीचा तुमच्या आहारात समावेश करा.
३) वरीचे तांदूळ आणि दाण्याची आमटी त्यात एक चमचा घरी बनविलेले तूप टाकून खा. यामुळे तुमचा उपवासही होईल आणि आरोग्यही चांगले राहील.
४) तुम्हाला ज्या दिवशी उपवास आहे. त्या दिवशी तुम्ही १ राजगिरा पोळी व १ वाटी उपवासाच्या भाज्या खा.
५) नारळीभात हा उपवासाला चालतो आणि हा आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
६) तसेच उपवास असल्यावर दोन जेवणाच्या दरम्यान १-२ वेळा बिनसाखरेचे लेमन टी, डिकासिन, चहा, कॉफी, दुध-हळद, लिंबूपाणी, गवती चहा काढा पिऊ शकता.
७) सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपताना उकळलेले पाणी प्यावे.
८) व्यायाम करा.
९) फिरायला जाण्यापुर्वी ग्लासभर कोमट पाणी आणि आल्यानंतर बिनसाखरेचे १ कप लेमन टी पिऊ शकता.
१०) दिवसातून दोन वेळाच जेवण करणार असाल तर सकाळी ८ ते ११ यावेळेत व संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत जेवण करा.
उपवासाचे फायदे –
१) उपवासामुळे खरे तर इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते.
२) पेशींमधील जळजळ व ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेस कमी होतो.
३) शरीरातील स्वच्छता व डिटॉक्सिफिकेशन केले जाते.
४) शरीराला हलकेपणा येतो, उत्साह वाढतो.
५) अंतर्गत क्षमता वाढते. त्यामुळे श्रावणात उपवास करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.