आरोग्यनामा ऑनलाइन – कौटुंबिक हिंसाचार म्हणजे महिलांचा शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ ही जागितक समस्या असून ती समोर येत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जवळपास ३० टक्के महिला घरात शारीरिक हिंसाचार सहन करत आहेत. प्रत्यक्षात हे प्रमाण यापेक्षाही जास्त असू शकते, अशी शक्यता नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार गांभीर्यानं घेणे गरजेचे आहे. कारण महिलांना घरात कशी वागणूक दिली जाते यावर त्यांच्या आजाराची अनेक कारणे अवलंबून असतात. याचे एक उदाहरण द्यायचे म्हणजे ३२ वर्षांच्या एक महिला मासिक पाळी अनियमित असल्याची तक्रार डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी जेव्हा तिची तपासणी केली त्यावेळी तिला कुपोषण, पाठदुखी आणि डिप्रेशन असल्याचे आढळून आले. यानंतर त्या महिलेचे समुपदेशन करण्यात आले. घरगुती हिंसाचार आणि लैंगिक दुजाभावामुळे तिला होत असलेल्या मानसिक वेदना तिच्या सर्व आजारांचे मूळ होते.
घरात होत असलेल्या त्रासाची माहिती याच महिलेने डॉक्टरांना सांगितली. अनेक महिलांची तपासणी केल्यास त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमागे घरगुती हिंसाचार आणि लैंगिक भेदभाव असल्याचे दिसून येऊ शकते. भारतातील महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत असतो. आरोग्य सेवेतील लिंग, वर्ग आणि जातीय असमानता याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच आरोग्य सेवेचा दर्जाही सुधारण्याची आवश्यकता आहे. या सुधारणा केल्यास ह्युमन कॅपिटलचा दर्जा, बचत आणि गुंतवणूक यामुळे अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होऊ शकतो.