आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपले पोट चांगले असेल तर शरीर निरोगी राहते. अनेक आजारांची सुरूवात पोटातून होते, असे तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच स्वस्थ, निरोगी राहण्यासाठी दररोज फळे खावीत. विविध फळांमध्ये वेगवेगळ्याप्रकारचे गुणधर्म असतात. शरीराला उपयुक्त द्रव्य भरपूर प्रमाणात फळांमध्ये असतात. यासाठी कोणत्या फळामध्ये कोणते गुणधर्म आहेत, हे माहिती करून घ्यावे. काही फळांचे नियमितपणे सेवन केले, तर केवळ आरोग्यच नव्हे, तर सौंदर्यवृद्धीही होते. ही फळे कोणती आहेत, त्याची माहिती घेवूयात.
सफरचंद
फळांमधील अँटीऑक्सिडेंट्समुळे विविध आजार टाळले जाऊ शकतात. सफरचंदात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. सफरचंदाच्या रसातून मिळणारे अॅसिटायकोलीन नावाचे रसायन मेंदू निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. अस्थमा, रक्तदाब नियंत्रणात राहतो. कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्निशियम, विटामीन बी आणि सी ही सर्व पोषक तत्त्वे सफरचंदातून मिळतात.
पपई
पपई आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामुळे पचनास मदत होतो. पपईचा गर व बिया औषधी असतात. व्हिटॅमिन ए, सी, ई आणि काही प्रमाणात बी आणि डी सुद्धा पपईत असते. पपई डोळ्यांसाठी लाभदायक आहे. पपईमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. हाडे मजबूत होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे. पचनशक्ती वाढते. त्वचा स्वस्थ आणि चमकदार होते.
संत्री
आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी संत्रा फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने आरोग्याशी संबंधित विविध समस्या सुटतात. रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हृदयरोगांची शक्यता कमी होते. उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. विषाणूजन्य संसर्गापासून बचाव होतो. मुतखड्याचा धोका कमी होतो. मलावरोधापासूनही सुटका होते.
आवळा
आवळ्याच्या नियमित सेवनाने जीवनशक्ती प्रचंड वाढते. आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट तर हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी व आतड्यांची कार्यशक्ती वाढते. यकृत स्वस्थ होऊन पचनशक्ती वाढते. रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरण चांगले होते. सात्विक वृत्ती जागृत करून ओज कांती वाढते. बारीक ताप ओसरतो. अति तहान लागणे व जळजळ दूर होते. अकाली वृद्धत्व, सर्दी, कफ, स्मरणशक्ती, हृदयरोग, रक्तदाब, मानसिक तणाव, अनिद्रा यावर गुणकारी आहे.
डाळिंब
डाळिंब हे एक पित्तशामक फळ आहे. तसेच आरोग्यासाठी उत्तम आहे. याच्या सालीतही भरपूर औषधी गुणधर्मही असतात. तणाव दूर करणे, हृदयरोगांचा धोका दूर करणे आणि सेक्स पॉवर वाढविण्यासाठी डाळिंब लाभदायक आहे. डाळिंबाच्या नियमित सेवनाने वाढत्या वयातील दुष्परिणामांनाही कमी केले जाऊ शकतात. स्मरणशक्ती वाढते व त्याचा मूडही चांगला राहतो. गर्भधारण क्षमतेमध्ये वृद्धी होते. चक्कर, तोंड येणे, लघवीतून वीर्य जाणे, रक्ताची कमतरता, यासाठी हे खूप लाभदायक फळ आहे.