आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यातील हवामान बदलाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. विशेषकरून केस आणि त्वचेसंबंधित समस्या निर्माण होतात. म्हणून पावसाळ्यामध्ये केसांची आणि त्वचेची काळजी घेतली पाहिजे.
अशी घ्या केसांची काळजी
पावसाळ्यात अनेकदा आपल डोकं भिजल्याने डोक्यात खाज येणे, कोंडा होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. यापासून सुटका करायची असेल तर केस शक्यतो कोरडे ठेवावेत. त्यासोबतच केसांना केवळ नारळाचेच तेल लावावे. तसेच कोंडा जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर कांद्याचा रस आठवड्यातून दोन वेळा लावावा.
या दिवसात सूर्यप्रकाश कमी राहत असल्याने केस लवकर कोरडेही होत नाहीत. त्यामुळे डोक्याला खाज येते, दुर्गंधी येते. अशावेळी आंघोळ करताना डोक्याची त्वचा पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्यासोबत योग्य अॅंन्टी-बॅक्टेरियल किंवा अॅंन्टीफंगल शॅम्पूचा वापर करावा. याने इंफेक्शन दूर राहण्यास मदत होते.
पावसाळ्यात केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा. जेणेकरून जास्त केस तुटणार नाही.
पावसाळ्यात ‘ई’ जीवनसत्त्व असलेला आहार घ्या. त्यामुळे तुमचे केस मजबूत राहतील.
भिजलेले केस बांधून ठेवू नका. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊन केसात खाज येऊ शकते. त्यामुळे ओले केस कोरडे करून मग बांधा.
पावसाच्या पाण्यात केस भिजले तरी लगेच धुऊन घ्या. तसेच केस धुतल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी कंडिशन करावेत.
कामाशिवाय पावसात बाहेर पडणे टाळा. पावसात भिजल्यानंतर केस माईल्ड क्लिंजरने स्वच्छ धुवावेत. तसेच त्यांना कंडिशनर लावावे.