आरोग्यनामा ऑनलाइन टीम – समुद्र किनारी फिरायला गेल्यानंतर पोहण्याचा मोह प्रत्येकाला होतोच. पोहता येत नसेल तर किनाऱ्यावर लाटांमध्ये डुंबण्याची मज्जा अनेकजण घेत असतात. मात्र, समुद्रात आंघोळ करण्याबाबत तज्ज्ञांनी जी माहिती दिली आहे ती पाहता, असा काही बेत तुम्ही आखला असेल तर पुन्हा विचार करा. एका रिसर्चनुसार समुद्राच्या पाण्यात पोहणे किंवा आंघोळ केल्याने स्किम मायक्रोबायोममध्ये बदलते. यामुळे कान आणि त्वचेवर इन्फेक्शनचा धोका वाढतो.मायक्रोबायोममध्ये बदल म्हणजे इन्फेक्शनप्रति अतिसंवेदनशीलता होय. अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायॉलॉजीच्या वार्षिक सभेत एएसएम मायक्रोब २०१९ मध्ये याबाबतच्या संशोधनाचा निष्कर्ष मांडण्यात आला.
यामध्ये शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, मायक्रोबायोममध्ये झालेला बदल इन्फेक्शन प्रति अतिसंवेदनशील ठरू शकतो. या प्रयोगात असे आढळून आले की, समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात आल्यावर व्यक्तीच्या त्वचेच्या विविधतेत आणि संरचनेत बदल होऊ शकतो. समुद्रातील पाण्याच्या संपर्कात आल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल म्हणजेच पोटाशी संबंधित आजार, श्वासासंबंधी आजार, कानात इन्फेक्शन आणि स्किन इन्फेक्शनचा धोका अनेक पटीने वाढतो. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी बीचवर असलेल्या ९ व्यक्तींची तपासणी केली. समुद्रातून आल्यावर १२ तास त्यांना आंघोळ करून दिली नाही. त्यांना सनस्क्रीनचा वापर करू नये असे सांगितले.
तसेच गेल्या सहा महिन्यांच्या काळात त्यांनी अँटी-बायोटिक औषधांचे सेवन केले नव्हते, हे देखील तपासण्यात आले होते. समुद्राच्या पाण्यात जाण्याआधी या रिसर्चमध्ये सहभागी लोकांच्या पायांच्या मागच्या बाजूच्या स्किनचे नमूने कॉटनच्या मदतीने घेण्यात आले होते. जेव्हा हे लोक समुद्रात पोहून १० मिनिटांनी परत आले आणि शरीर पुसले, त्यानंतर ६ तास आणि २४ तासांनी पुन्हा नमूने घेतले गेले. यातून असे आढळले की, समुद्रात स्विमिंग करण्याआधी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे कम्यूनिटीज होते, पण स्विमिंगनंतर सर्वांच्या शरीरावर एकसारखे कम्यूनिटीज होते.