आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काम तसेच अन्य कारणामुळे येणाऱ्या ताणतणावामुळे निद्रानाश म्हणजेच झोप न येण्याची समस्या अनेकांना सतावते. अलिकडे या समस्येचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. काही लोक झोपेच्या गोळ्या घेऊन या समस्येवर तात्पुरता इलाज करतात. यामुळे कधीकधी डिप्रेशन सुद्धा येते. सर्व वयोगटातील लोकांना हा त्रास जाणवू लागला आहे.
झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच ब्लडप्रेशर वाढणे, पोटाच्या समस्या, मानसिक विकार इत्यादी समस्या जडतात. यासाठी काही सोपे घरगुती उपाय करता येऊ शकतात. घरगुती उपाय करूनही निद्रानाश न गेल्यास आयुर्वेदिक पंचकर्मातील शिरोधारा करावी. यामुळे मन व डोके शांत होऊन झोप येते.
अशी घ्या काळजी
* रात्री हलके जेवण घ्यावे. अति तिखट, मसालेदार, मांसाहारी पदार्थ टाळावे. जास्त पाणी पिऊ नये.
* रात्री झोपताना संगीत ऐकावे. दीर्घ श्वसन करावे.
* झोपण्याच्या बेडवर अन्य वस्तू ठेवू नये. त्यांचा वापर करू नये.
* चिंता दूर सारून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
* झोपण्यापूर्वी चेहरा व डोक्याची तेलाने हळुवार मालिश करावी.
* नियमित व्यायाम करावा. यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होऊन झोप येते.
* योगा, प्राणायाम व देवाची प्रार्थना करावी
निद्रानाशाची कारणे
* खराब वातावरणात जगणे, काम करणे.
* जास्त अपेक्षा, सतत विचार करणे.
* कॉफी, बिअर, सिगारेट, उत्तेजक दृश्य बघणे, विचार करणे.
* मलबद्धता. उपाशी झोपणे, पोटाचे आजार.
* झोपताना जास्त प्रमाणात पाणी पिणे.
* रात्री झोपताना टीव्ही बघणे, मोबाईलचा वापर करणे.
* पिझ्झा, बर्गर, वडापाव, चायनीजसारखे पदार्थ खाणे.