आरोग्यनामा ऑनलाइन टीम : मुजफ्फरपूर : एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंडड्ढोम (अएड) आजाराने बिहारमध्ये ६६ मुलांचा बळी घेतला आहे. मागील काही दिवसांपासून येथे या आजाराने थैमान घातले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून पावसापुर्वी हा आजार येथे पसरतो. यापूर्वीही काही मुलांचे बळी येथे गेले आहेत. मात्र,यावेळेस झालेली जीवितहानी खूपच जास्त असल्याने बिहारमध्ये भितीचे वातावरण आहे. राज्य सरकार लक्ष देत नसल्याने ६६ मुलांचा बळी गेल्याचा आरोप मुलांचे नातेवाईक व अन्य नागरिक करत आहेत. येथील एसकेएससीएच रुग्णालयात ५५ मुलांचा इन्सेफेलाईटीसने मृत्यू झाला तर केजरीवाल रुग्णालयामध्ये ११ मुलांचा मृत्यू झाला आहे.अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या आजाराने ६६ बळी घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुले या इन्सेफेलाईटीस तापाने दगावतात आहेत. गेल्या वर्षीही या आजाराने २२ मुलांचा मृत्यू झाला होता.
आजाराची लक्षणे
सुरुवातीला जोरदार ताप येतो
पाच ते दहा वयोगटातील मुलांना हा आजार होतो
डोकं दुखणे, अशक्तपणा येणे
उलट्या होणे, भूक न लागणे, अतिसंवेदनशील होणे
शरीर दुखणे, हालचालीवर परिणाम, मानसिक अस्वस्थता,
बेशुद्ध होणे, आकडी येणे, भीती, कोमामध्ये जाणे
हा आजार जून ते ऑक्टोबर दरम्यान बळावतो.
कोणती काळजी घ्यावी
वरील लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लिची हे फळ खाल्ल्याने हा आजार बळावतो,असे तज्ज्ञ सांगतात. हा आजार शरिरातील मुख्य मज्जासंस्थेला प्रभावित करतो. लहान मुलांची मज्जासंस्था कमजोर असल्याने त्यावर जास्त परिणाम होतो.लिचीचे प्राकृतिक रूप हाइपोग्लीसीन ए मध्ये मोडते. यामुळे शरीरात फॅटी अॅसिड बनविण्यास व्यत्यय येतो. यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होते. मेंदूशी संबंधीत आजार वाढू लागतो. सकाळी किंवा सायंकाळी उपाशीपोटी लिची खावू नये, असे आवाहन बिहारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.