आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मोतीबिंदू या डोळ्यांच्या विकाराबाबत सहसा सर्वांना माहिती असते मात्र काचबिंदू (ग्लॅकोमा) या नेत्रविकाराबाबत मात्र हवी तेवढी माहिती अजून झालेली नाही. विशेष म्हणजे रुग्णाला या आजाराची लक्षणे देखील जाणवत नाहीत आणि ती लक्षात येईपर्यंत रुग्णाला याचा बराच त्रास सहन करावा लागला. म्हणूनच डोळ्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे आणि काच बिंदूची लक्षण आढळल्यास त्यावर तातडीने उपचार करणे देखील आवश्यक आहे.
काचबिंदूने दृष्टी हळूहळू अधू होण्यास सुरुवात होते आणि वेळीच उपचार न केल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते. अंधत्व देण्याच्या कारणात काचबिंदू या आजाराचा ३ रा क्रमांक लागतो.
म्हणून होतो काचबिंदू –
भिंग आणि नेत्रपटल यांच्यामध्ये एक द्रव स्वरुपाचा पदार्थ असतो. या द्रवपदार्थाचा दाब वाढल्याने ऑप्टिक नर्व्हवर दाब येतो आणि दृष्टी कमजोर होत जाऊन अधू होते. यालाच काचबिंदू म्हणतात. हा दाब प्रमाणाबाहेर वाढल्यास अंधत्व येते. काच बिंदूचा तसा दोन्ही डोळ्यांवर परिणाम होत असतो. परंतू दृष्टी कमी होत असणारे दोन्ही डोळ्यांचे प्रमाण सारखेच असेल असे काही नाही. या द्रवाचा दाब वाढल्यास ऑप्टिक नर्व्हला इजा होते. या नसेला इजा पोहचल्यास याचा दृष्टीवर परिणाम होतो.
हे आहेत उपचार –
काचबिंदूच्या लक्षणांमध्ये चित्रपटग्रहासारख्या आंधाऱ्या ठिकाणी दृष्टी न स्थिरावणे, दृष्टी हळूहळू कमी होणे. अंधूक दिसणे असा परिणाम होतो. गोनिओस्कोपी, पेरीमेट्री, टोनोमेट्री या चाचण्याच्या आधारे काचबिंदूचे निदान केले जाते. गोनिओस्कोपीमधून काचबिंदूचा प्रकार ओळखला जातो. पेरिमेट्रीने दृष्टी किती कमजोर झाली आहे हे तपासले जाते, तर टोनोमेट्रीच्या सहाय्याने डोळ्यातील द्रवाचा दाब मोजला जातो.या मुळे काच बिंदू कोणत्या टप्प्यात आला आहे हे देखील समजते. म्हणून ही तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. काच बिंदू पुर्ण पणे बरा होऊ शकत नाही. परंतू त्यामुळे डोळ्यांचे आधिक नुकसान होऊ नये याची काळजी घेता येते. हे उपचार आयुष्यभर घ्यावे लागतात.
काचबिंदू झाल्यास नेहमी नेत्रतज्ञांनी सांगितलेला ड्रॅप डोळ्यात टाकावा लागतो. शस्त्रक्रिया देखील केली जाते. यावेळी डोळ्यातून द्रव बाहेर काढण्यात येतो. लेसर किरणांच्या सहाय्याने हे उपचार केले जातात. त्यामुळे डोळ्यातील दाब कमी होतो. या दरम्यान योग्य औषधे वेळोवेळी घ्यावी लागतात. असे केल्यास आधिक नुकसान रोखता येते.