आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य आणि आहाराबाबत अनेकदा वेगवेगळे सल्ले आपल्याला दिले जातात. यापैकी नक्की कोणता सल्ला योग्य आहे, याबाबत मग गोंधळ उडतो. अशावेळी तज्ज्ञांकडून योग्य सल्ला घेतल्यास ते फायदेशिर ठरते. शिवाय, मनातील गैरसमजही दूर होतात. उदाहरण द्यायचे झाले तर अंडी खाण्याबाबतचे देता येईल. काहीजण सांगतात, रोज अंडी खावीत. तर, काहीजण सांगतात की, अंड्यांचे सेवन हृदयासाठी घातक असते. अशाच प्रकारचे गैरसमज दूर करण्यासाठी आपण तज्ज्ञ काय सांगतात, हे जाणून घेणार आहोत.
अंड्यांत २०० मिलिग्रॅम कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असते. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता बळावते, असे काहीजण म्हणतात. मात्र, हृदयरोगतज्ज्ञांच्या मते दररोज एक अंडे खाल्ल्यास आरोग्यास काहीही अपाय होत नाही. आरोग्याची जास्तच काळजी वाटत असेल तर अंड्याचा पांढरा भागच खावा. त्यातील प्रोटीन्स आरोग्यास खूप आवश्यक असतात.
उन्हात कोणते सनस्क्रीन वापरावे याबाबतही असेच वेगवेगळे समज आहेत. उन्हात जास्त वेळ घालवल्यास सुरकुत्या, चेहऱ्या वर डाग, त्वचेच्या कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात, असा समज आहे. एसपीएफने यूव्ही-बी म्हणजेच अतिनील बी किरणांपासून बचाव होतो. त्यामुळे यूव्ही-ए व यूव्ही-बी दोन्हींपासून बचाव करणारे सनस्क्रीन वापरावे, असे तज्ज्ञ सांगतात. वारंवार चेहरा धुतल्याने मुरमांपासून सुटका होते, असाही एक गैरसमज आहे. मुरमे होण्याची अनेक कारणे असतात.
उलट वारंवार चेहरा धुतल्याने ही समस्या आणखी वाढू शकते. कोरडी त्वचा असलेल्या लोकांना मुरमांची समस्या कमी जाणवते. तसेच काही लोक समजतात की फ्ल्यू व सर्दीत फरक नाही. परंतु, असे म्हणणे चूकीचे आहे. सर्दी-पडशामुळे आरोग्याची मोठी हानी होत नाही. ती काही दिवसांत बरीही होऊन जाते. मात्र, फ्ल्यूमध्ये न्यूमोनियासारख्या गंभीर आजारांचा धोका असतो.