आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एक्यूट इन्सेफेलाइटिस सिंड्रोम (आयईएस) आजाराने तब्बल १९ मुलांचा बळी घेतला आहे. धक्कादायक म्हणजे मागील अवघ्या पाच दिवसांत या आजाराने हे बळी घेतले आहेत. एसकेएससीएच या रुग्णालयात १५ तर अन्य खासगी रुग्णालयांमध्ये ४ मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही अनेक मुलांवर उपचार सुरू आहेत.
शनिवारी रुग्णालयात इन्सेफेलाइटिस आजाराने ग्रस्त ३८ मुलांना दाखल करण्यात आले. अनेक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या आजाराने १९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एसकेएमसीएच मुजफ्फरपूरचे अधीक्षक डॉ. सुनील शाही यांनी दिली. प्रशासनाने या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुले या इन्सेफेलाइटिस तापाने दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने २२ मुलांचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्याआधी हा आजार होत असल्याचे लोकांनी सांगितले. २०१४ पासून इन्सेफेलाइटिस हा आजार मुलांना होत आहे.
इन्सेफेलाइटिसची लक्षणे
पाच ते दहा वयोगटातील मुलांना हा आजार होतो. ताप येणे, डोकं दुखणं, अशक्तपणा येणं, उलट्या होणं, भूक न लागणं, अतिसंवेदनशील होणं ही या आजाराची लक्षणं आहेत.
अशी घ्या काळजी
या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे. अस्वच्छ पाण्यापासून दूर राहावे, आरोग्याची नीट काळजी घ्यावी. मच्छारांपासून लांब राहावे.