आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळा सुरू झाला की रोगराई मोठ्या प्रमाणात पसरते. सर्दी, खोकला, ताप, थंडीताप, जुलाब असे आजार सातत्याने होत असतात. पावसाळ्यात आजारी पडण्याचे प्रमाण इतर ऋतूच्या तुलनेत जरा जास्त असते. म्हणून पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. योग्य काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहू शकते आणि पावसाचा आनंद घेता येतो.
पावसाळी हवामानात शरीराची रोग प्रतिकार क्षमता सक्षम ठेवणे गरजेचे असते. यासाठी गहू आणि तांदळापासून तयार केलेला हलका आहार घ्यावा. पालेभाज्यांच्या सूपला प्राधान्य द्यावे. रोज सकाळी अनशापोटी कोमट पाण्यात मध टाकून प्यावे. मूगडाळ आणि आले यांचा दररोजच्या आहारात समावेश करावा. पावसाळ्यात घरी तयार केलेले गरम अन्न खावे. तसेच नियमित व्यायाम करावा. यामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते.
पावसाळ्यात आद्रता असलेल्या ठिकाणे थांबणे शक्यतो टाळले पाहिजे. अस्थमा किंवा मधुमेहासारख्या आजार असणारांनी जास्त आद्रता असलेल्या ठिकाणी थांबू नये. आद्रतेमुळे बुरशी वाढते. हे अस्थमा आणि मधुमेही रुग्णांसाठी घातक असते. तसेच पावसाळ्यात हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदल असते. बदलत्या हवामानामुळे ताप येण्याची शक्यता असते. अशावेळी ताप आल्यास दुर्लक्ष करू नये. दोन दिवसांपेक्षा जास्त काळ ताप राहिल्यास डॉक्टराकडे जावे.
पावसाळ्यात या गोष्टी टाळाव्यात
* दिवसा जास्त वेळ झोपू नये.
* जास्त शारीरिक काम करण्याचे टाळावे.
* थकलेले शरीर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
* पावसाळ्यात पडणाऱ्या उन्हात जास्त वेळ थांबू नये.
* पावसाळ्यात भिजल्यानंतर लवकरात लवकर कपडे बदलावे.
* घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये.
* मधुमेही रुग्णांनी अनवाणी चिखलात जाऊ नये.