आरोग्यनामा ऑनलाइन टीम – किडनी ही शरीरातील काही अतिशय महत्वाच्या भागांपैकी एक आहे. किडनी शरीराची स्वच्छता करण्याचे काम करते. जर किडनी योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीरात विविध आजार उत्पन्न होतात. शरीरातील विषारी, विजातीय पदार्थ बाहेर काढून रक्त स्वच्छ करण्याचे महत्वाचे कार्य किडनी करते. शरीरात मिनरल्स, अॅसिड्स यांना संतुलित ठेवण्याचे कामही किडनी करते. किडनी खराब होण्याची काही कारणे आहेत. काही चूकीच्या सवयींमुळे किडनीसारखा महत्वाचा भाग खराब होऊ शकतो. या सवयी कोणत्या याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
थंडपेय
बाजारातील थंडपेय पीत असाल तर हे शरीरासाठी खूप घातक ठरू शकते. जास्त प्रमाणात थंडपेय पिल्यास प्रोटीन लघवीद्वारे बाहेर पडतात. असे होत असेल तर किडनी योग्यप्रकारे काम करत नाही, असे समजावे.
पूर्ण झोप न घेणे
आपण झोपल्यानंतर किडनीच्या नवीन पेशींचे नवनिर्माण होते. यामुळे पूर्ण आणि शांत झोपेची आवश्यकता असते. योग्य प्रकारे झोप मिळाली नाही तर या क्रियेमध्ये बाधा निर्माण होते. याचा वाईट परिणाम किडनीवर होऊ शकतो.
मांसाहार
मांसाहार केल्यामुळे किडनीच्या मेटाबॉलिज्मवर जास्त दाब येतो. आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेत असल्यास किडनीला जास्त काम करावे लागते. यामुळे किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
दारू आणि सिगरेट
जास्त प्रमाणात आणि नियमितपणे सिगरेट, दारू सेवन केल्याने लिव्हरसह किडनीवर अत्यंत वाईट परिणाम होतो. या सवयीमुळे किडनी खराब होऊन मृत्यु सुद्धा होऊ शकतो.
पोषक तत्वांची कमतरता
आहारामध्ये ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. किडनी आणि संपूर्ण शरीरासाठी हे खूप गरजेचे आहे. आहारात मिनिरल्स आणि व्हिटॅमिनची कमतरता हे किडनी फेल आणि स्टोन होण्यामागील मुख्य कारण आहे. मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन किडनी निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक असते.
लघवी रोखणे
जास्त प्रमाणात लघवी रोखून धरण्याची सवय असल्यास किडनीसाठी हे खूप धोकादायक आहे. यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे किडनी खराब होते. यामुळे लघवी कधीही दाबून ठेवू नये.
पाणी कमी पिणे
कमी प्रमाणात पाणी पिण्याची सवय असेल तर किडनीला रक्त शुद्ध करण्यासाठी लिक्विड मिळत नाही. यामुळे रक्तामध्ये जमा झालेली घाण शरीरातच राहते. यामुळे किडनी लवकर खराब होऊ शकते.
मीठ जास्त खाणे
शरीराला मीठ म्हणजेच सोडियमची आवश्यकता असते. पण त्याचे प्रमाण योग्य असावे. फळे आणि भाज्यांमधून योग्य प्रमाणात हे तत्व शरीराला मिळत असते. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने ब्लडप्रेशर वाढते. यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव येतो. दिवसातून ५ ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम घेऊ नये.