आरोग्यनामा ऑनलाइन टीम – त्वचेवर लाल रंगाची पुरळ उठून हळू हळू हि पुरळ संपूर्ण शरीराचा ताबा घेते, या गुणधर्मामुळेच या आजाराला नागीण हे नाव पडले. काय आहेत याच्या मागची खरी कारणे आणि गैरसमज यांच्या बाबतीत अनेक मतमतांतरे आहेत.
पण नागिणमुळे रुग्ण मरत नाही. पण जास्त प्रमाणात यायचं कारण म्हणजे इतर रोग. उदाहरणार्थ क्षय रोग ! काही प्रकारचे कर्करोग किंवा हल्ली अनेकांमध्ये प्रतिकार शक्तीची कमतरता असणे. तसेच एड्स किंवा एचआयव्ही. रूग्ण अशा आजारांनी दगावतो. नागिणीमुळे रूग्ण दगावत नाही, पण औषध बरोबर आणि वेळेवर घेणे गरजेचे आहे.
या नागिणीबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धाच जास्त आहे. हा रोग ‘बॅरिसेल्सा’ नावाच्या विषाणुंमुळे होतो. सध्या तर हे विषाणू मारायला चांगली औषधं आहेत. ५ ते ७ दिवस गोळ्या खाल्ल्यावर रोग चटकन बरा होतो. जखमा भरायला थोडासा वेळ लागतो. पहिले दोन दिवस पुरळ यायच्या आधी जिथे पुरळ येणार तिथे खूप दुखतं. अगदी छातीवर आला तर हार्ट अॅटॅकप्रमाणे किंवा पोटावर अॅपेंडीसच्या इन्फेक्शनप्रमाणे. पाणी भरलेले छोटे छोटे पुरळ अगदी एका रेषेत येतात आणि पसरतात अगदी नागिणीप्रमाणे. काही जणांना थोडीशी वेदना होते, तर काहींना खूपच. जेवढं प्रमाण वाढतं, तेवढ्या वेदनाही वाढतात. ही वेदना काही जणांच्या बाबतीत पुरळ बरं झालं, तरी जास्त दिवस राहू शकते. कारण ते मज्जातंतू बरे व्हायला वेळ लागतो. काही जणांना तर अगदी रडवेलं होईपर्यंत दुखू शकतं. पण त्यावरही औषधं आहेत आणि हळूहळू हा प्रकार कमी होतो.
हा कुणालाही होऊ शकतो, पण लहान मुलांमध्ये क्वचित. कारण पहिल्यांदा कांजिण्या येतात हे आपण पाहिलं. तसा हा रोग संसर्गजन्य आहे. ज्यांना कांजिण्या झाल्या आहेत किंवा ज्यांनी त्याची लस टोचून घेतली आहे त्यांना काहीच त्रास नाही. नागिणीच्या रूग्णाकडून दुसऱ्यांना नागीण नाही होऊ शकत, पण कांजिण्या मात्र होऊ शकतात.
कधी त्रास जास्त असेल तर स्रायूंच्या संवेदना नष्ट होऊ शकतात. क्वचित एड्ससारख्या रूग्णांमध्ये हा पसरून मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या भोवती जर आला तर नेत्रतज्ज्ञाची मदत जरूर घ्यावी. कधी कानात आला तरीही त्रास होऊ शकतो. चेहऱ्यावरील कोणत्याही भागाची विशेष काळजी घ्यावी. थोडक्यात काय तर नागीण या आजाराबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. पण त्या टाळून लवकर आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.