आरोग्यनामा ऑनलाईन – अनेक महिलांमध्ये मासिक पाळीत अधिक रक्त्त जाणे, पोटात खूप दुखणे, पाळी लवकर येणे ही लक्षणे आढळतात असा त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार आणि मार्गदर्शन घेतले पाहिजेत. गर्भाशयामधील अस्तरातील स्नायुपेशींची काही कारणांमुळे जास्त वाढ होऊन छोट्या-छोट्या गाठी होतात.
त्यांना तंतू स्नायू अर्बुद म्हणतात. या गाठी कॅन्सरच्या असतात असे नाही; पण या गाठीमुळे पाळीत खूप रक्त जाणे, ओटी पोटात खूप दुखणे असा त्रास होत असतो. तसेच या गाठीमुळे गर्भधारणेसाठीदेखील अडथळा येतो. महिलांच्या आरोग्याचे मुख्य मूळ गर्भाशयात आहे. गर्भाशय हा तीन स्तरांनी बनलेला असतो.
सर्वांत आतलं अस्तर म्हणजे अंतस्तर. हे ग्रंथीपेशींच्या पटलानं तयार झालेलं असतं आणि दर महिन्याला हेच अस्तर पाळीच्या रूपात शरीराबाहेर टाकलं जातं. गर्भाशयामधील अस्तर स्नायुपेशी आणि तंतुपेशी यांच्या मिश्रणानं बनलेलं असतं तर गर्भाशयाच्या बाहेरच्या अस्तराला सिरमी पटल म्हणतात. गर्भाशयात होणाऱ्या या गाठीचं कारण अजून निश्चित झालं नाही; पण या गाठी होण्यामागे आनुवंशिकता हेही एक कारण असतं.
इस्टड्ढोजेनचा प्रभाव प्रोजेस्टेरॉनपेक्षा जास्त असल्यामुळे किंवा ओव्हुलेशन प्रक्रिया बरोबर न झाल्यामुळे देखील या गाठी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, स्थूलपणा, जंकफूड ही सर्व कारणंही गाठी होण्यामागे असू शकतात. गर्भाशयातील गाठींचे सबम्युकोसल फायब्रॉइड, सबसिरोसल फायब्रॉइड असे प्रकार आहेत. यामुळे मासिक पाळी जास्त दिवस जाते.
फायब्रॉइडमुळे गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. गर्भाशयाच्या बाहेरील अस्तराच्या दिशेनं वाढणाऱ्या गाठी म्हणजे सबसिरोसल फायब्रॉइड होय. या प्रकारच्या गाठीमुळे मूत्राशय आणि गुदाशयावर भार पडत असतो, म्हणून या फायब्रॉइडमुळे लघवीचा आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.