आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तुळशीच्या पानात कॅलशियम, फॉस्फरस इत्यादी खनिजे असतात. तुळशीच्या पानांची, फुलांच्या मंजिऱ्यांची चव कमी जास्त तिखट असते व उष्ण गुण असतो. तुळशीच्या मंजिऱ्यांमधील बिया अतिशय बारीक, गोल व काळ्या रंगाच्या असतात. या बिया पाण्यात घातल्या असता बुळबुळीत होतात. चवीला गोड असून थंड गुणाच्या असतात. तुळशीच्या पानांना, मंजिऱ्यांना तैलांशामुळे सुगंध येतो. या तेलामध्ये सुमारे सत्तर टक्के युजेनॉल नावाचे औषधी कार्यकारी तत्त्व असते.
तुळशीचे उपयोग
* तुळशीचा मलेरिया होऊ नये म्हणून व झाल्यावरही चांगला उपयोग होतो, असे रिसर्च इन्स्टिट्यूट लखनऊ या शासकीय संस्थेमध्ये झालेल्या संशोधनावरून स्पष्ट झाले आहे. मलेरियावर उपाय करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस २ चमचे, मिरपूड अर्धा चमचा, दोन चमचे मध दिवसातून २ ते ३ वेळा घ्यावे.
* तुळशीची पाने व मंजिऱ्यामधील जंतुघ्न, कृमिघ्न तैलाशांमुळे तुळशीच्या झाडाभोवतालची हवा शुद्ध होते. म्हणून फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीही दररोज तुळशीला जास्तीत जास्त फेऱ्या माराव्यात व ८ ते १० पाने, फुलांच्या मंजिऱ्या चावून खाव्यात, यामुळे आरोग्य उत्तम होते.
* तुळसीचे बी मधुर, शीतगुणाचे, धातुवर्धक, पित्तशामक व शुक्रवर्धक आहे. त्यामुळे त्याचा उपयोग अशक्तपणा, शुक्रवाढीसाठी व लघवीच्या विकारांमध्ये चांगला होतो. अशक्तपणा व शुक्रवाढीसाठी तुळशीच्या बियांची खीर दूध साखरेबरोबर १ कप प्यावी. लघवीची जळजळ, कष्टाने लघवी होणे इत्यादी तक्रारींवर थंड पाण्यामध्ये तुळशीच्या बियांचे सरबत साखर घालून थोडे थोडे वरचेवर प्यावे.
* भूक न लागणे व अपचन असल्यास जेवणाआधी तुळशीची ८ ते १० पाने चावून खावीत. जेवणात भातावर तुळशीची पाने घालण्याची परंपरा आहे
* हृदयाच्या आरोग्यासाठी तुळस पानामुळे विशेषत: हृदयाचे रक्ताभिसरण होते. प्रत्येकाने दररोज १० ते १२ तुळशीची पाने चावून खावीत. तुळशीच्या पानांचा रस २ चमचे, एक चमचा मध दिवसातून २ ते ३ वेळा घ्यावा.
* पावसाळ्यात, हिवाळ्यात सर्दी व खोकला व अॅलर्जी, कोरड्या ढासेच्या खोकल्यावर तुळस फारच उपयुक्त आहे. तुळशीची पाने दिवसातून ३ ते ४ वेळा चावून खावीत.
* तुळशीमुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन मन शांत होते, असे रशियामधील एका संशोधनात दिसून आले आहे.
* पावसाळ्यात, हिवाळ्यात येणाऱ्या तापावर तुळस गुणकारी आहे. २ चमचे तुळसीचा रस, एक चमचा मध दिवसातून ३ ते ४ वेळा घ्यावा. अशा तापाबरोबर असणारे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी लक्षणेही तुळशीमुळे कमी होतात.
* शिबे, गजकर्ण इत्यादी बुरशीजन्य कातडीच्या विकारांवर तुळशीच्या पानांचा रस, लिंबाचा रस कातडीवर वरचेवर चोळावा.
* कातडीतील रक्तप्रसादन चांगले होऊन व जंतुनाशक होऊन त्वचा निरोगी राहते. म्हणून तुळशीची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने अंघोळ करावी.
* तुळशीची पाने वाटून जखमेवर लेप लावल्यास जखम स्वच्छ होऊन भरून येते.