आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जास्त मीठ खाणे आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. मिठाच्या अधिक सेवनामुळे आतड्यांना सूज येऊ शकते. तर मीठाचे योग्यप्रमाणात सेवन केल्यास आरोग्य चांगले राहू शकते, असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे. सोडियमचे अधिक सेवन केल्याने आतड्यांवर सूज आल्याचे, या संशोधनात आढळून आले.
तसेच जास्त फायबर असलेला आहार घेणाऱ्या लोकांमध्ये कमी फायबर असलेला आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत आतड्यांवर अधिक सूज आढळली. तसेच जास्त मीठ खाल्ल्याने अल्सरची समस्या सुद्धा होऊ शकते. शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणजेच एच पायलोरी बॅक्टेरिया सक्रिय होतात. यामुळे पोटात अल्सरची समस्या होऊ शकते. जास्त मिठामुळे शरीरातील एच पायरोली बॅक्टेरिया घातक रूप घेतात आणि पचनक्रिया कमजोर करतात.
यानेच अल्सरची समस्या होऊ शकते, असे या संशोधनात आढळून आले. तर अन्य काही संशोधनात असे आढळून आले की, मिठाच्या अधिक सेवनामुळे आतड्यांचा कॅन्सर, किडनीसंबंधी समस्या, शरीरात सूज आणि किडनी स्टोन होण्याचाही धोका अनेक पटीने वाढतो.
अमेरिकेतील साधारण एक तृतियांश लोकांना आतड्यांवर सूज येण्याची समस्या जाणवते. पोटात तयार होणारा गॅसमुळे हा त्रास होतो. हा गॅस फायबरला पचवणाऱ्या बॅक्टेरियामुळे होतो. फायबरयुक्त पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण वाढल्याने गॅसची समस्या होते. त्यामुळे अधिक फायबरयुक्त आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे, असे संशोधक सांगतात.