आरोग्यनामा ऑनलाइन टीम : तारूण्य हे सर्वांनाच हवेहवेसे वाटते. तारूण्य जपण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. शिवाय, याबाबतीत महिला अधिक जागृत असतात. मात्र, तारूण्य टिकवण्यासाठी विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. चेहरा आणि शरीर तजेलदार दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग होत नाही. त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
तारूण्य टिकवण्यासाठी शरीरातील शुगरचे प्रमाण कमी ठेवणे गरजेचे असते. यासाठी आहारात गोड खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे. गोड पदार्थांचे सेन केल्यास वेळेआधी वाढत्या वयाची लक्षणे दिसू लागतात. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यास त्वचा तजेलदार ठेवणाऱ्या कोलेजनचे नुकसान होते. कोलेजनची हानी झाल्यास त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. यासाठी गोडपदार्थ टाळले पाहिजेत. सध्याच्या वयापेक्षा दहा वर्षांनी लहान दिसायचे असल्यास सदैव सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.
सकारात्मक विचारामुळे तणाव, ऑर्थरायटिस, स्मृतिभंश, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असे आजार कायम दूर राहतात. विचारावर आपले आरोग्य अवलंबून असते, असे तज्ज्ञ सांगतात. यासाठी नेहमी शुद्ध विचार असणे लाभदायक ठरते. तसेच तरुण दिसण्यासाठी फक्त चेहऱ्याची काळजी घेणे योग्य नाही. चेहऱ्यावर मॉइश्चर लावताना मानेला सुद्धा मॉइश्चर करावे. हात-पाय धुतल्यानंतर प्रत्येकवेळी हातापायांना लोशन लावले पाहिजे. रात्री हातांना ऑलिव्ह ऑइलने मसाज केल्यास ते अधिक लाभदायक ठरते.