आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीर आणि मनाच्या स्वच्छतेशिवाय समाधीच्या स्थितीपर्यंत पोहोचणे शक्य नाही. ध्यानामध्ये एकरूप होण्यासाठी योगाच्या या आठ अंगांचे पूर्ण पालन करणे आवश्यक आहे. ध्यानाने समाधी प्राप्त करण्यासाठी योगाच्या आठ अंगातून जावे लागते. योगाचे आठ चरण अष्टांग योगाने ओळखले जातात. याबाबत काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
योगाचे आठ अंग
१. यम २. नियम ३. आसन ४. प्राणायाम ५. प्रत्याहार ६. धारणा ७. ध्यान ८. समाधी.
हे आवश्यक आहे
समाधी लावण्यासाठी यम आणि नियमाचे पालन केले पाहिजे. यम आणि नियमाचे पालन केल्याने व्यक्ती खोटे बोलणे, बळजबरी करणे, चोरी करणे, कपट करणे यापासून दूर राहतो. काम, क्रोध, मोह, लोभ या गोष्टींना वश केल्यामुळे मन स्वच्छ आणि पवित्र राहते. यम आणि नियमाचे पालन केल्याशिवाय ध्यान आणि समाधी अशक्य आहे. तसेच प्राणायामसुद्धा करता येणार नाही.
यम
यम या नावाचा दुसरा अर्थ महाव्रत आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या पाच कामांचे नाव यम आहे.यमाची पाच अंगे आहेत. अहिंसा – एखाद्या जीवाला कोणत्याही प्रकरचे शारीरिक नुकसान न पोहोचवणे म्हणजे अहिंसा. सत्य – नेहमी सत्य वचन करणे. कधीही स्वार्थासाठी खोटे बोलू नये. अस्तेय- चोरी न करणे. ब्रह्मचर्य- विषय वासनेपासून दूर राहणे. अपरिग्रह- शब्दाने, रूपाने, रसाने, गंधाने, स्पर्शाने प्रभावित न होणे. अपरिग्रह म्हणजे जे ग्रहण केले जात नाही.
नियम
पवित्रता, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर भक्ती हे पाच नियम आहेत. पवित्रता- पवित्रता दोन प्रकारची असते. बाह्य पवित्रता : शरीराची पाण्याने शुद्धी बाह्य पवित्रता आहे. आंतरिक पवित्रता : मनातील दुर्गुण काढून टाकणे ही आंतरिक पवित्रता आहे. संतोष- सुख-दुःख प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रसन्न राहणे म्हणजेच संतोष आहे. तप- शरीराला त्याच्या सुखापासुन दूर ठेवणे तप आहे. जीवनात व्रत नियमाचे पालन तपाच्या अंतर्गत येते. स्वाध्याय- ग्रंथांचे अध्ययन, आपला अभ्यास करत राहण्याचे नाव स्वाध्याय आहे. ईश्वर भक्ति- मन, वचन, कर्माने ईश्वराला मानने ईश्वर भक्ती आहे.
आसन
आसन म्हणजे बसणे. योगामध्ये आसनाचा अर्थ सुखपूर्वक एकाच स्थितीमध्ये स्वतःला ठेवण्याच्या मुद्रेमध्ये बसणे. आसन विविध प्रकारचे असतात. यामध्ये सिद्धासन, पद्मासन हे प्रमुख आसन आहे.
प्राणायाम
लयबद्ध श्वसनाला योगामध्ये अतिशय महत्त्व आहे. प्राणायामाच्या अचूक व नियमित सरावामुळे फुफ्फुसांची श्वसनक्षमता वाढते आणि म्हणूनच साधकाचे आयुष्य वाढते. साधकाला निरोगी शरीर, स्थिर व प्रसन्न चित्त, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचूक निर्णयक्षमता प्राप्त होते.
प्रत्याहार
प्रत्याहार म्हणजे मन आणि इंद्रिये यांच्यावर ताबा मिळवण्याची शिस्त. प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे इंद्रियांना शांत ठेवणे शक्य होते.
धारणा
एखाद्या बिंदूवर, विषयावर एकाग्रता साधण्याची कला म्हणजे धारणा. यामुळे आंतरिक जागरूकता निर्माण होते व मनातील विचारांचे संकलन होऊन मानसिक ताणतणाव दूर होतात. धारणा दीर्घकाळ टिकून राहिली की मगच ध्यान लागते.
ध्यान
धारणेमध्ये लागलेल्या त्या एक वस्तूमध्येच निरंतर राहणे ध्यान आहे. साधकाच्या संपूर्ण मनोकायिक रचनेमध्ये सुयोग्य बदल घडवून आणण्याची शक्ती असते म्हणूनच ध्यानाला अतिशय महत्त्व आहे.
समाधी
कोणताही व्यत्यय न येता दीर्घकाळ ध्यान लागले की समाधी लागते. हे योगसाधनेतील शेवटचे अंग किंवा टप्पा आहे.