आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शारीरीक आरोग्य आणि सौंदर्याची काळजी घेणे जेवढे महत्वाचे असते, तेवढेच दातांची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु, दातांबाबत काही लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात. दातांची एखादी समस्या असल्यास वेळीच उपाय करण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे समस्या अधिक गंभीर होऊ शकते. दातांबाबत असलेले काही गैरसमज आणि सत्य आपण जाणून घेणार आहोत.
हे आहे सत्य-
१) रूट कॅनल दात दुखल्यावरच करतात, असे काहीजण म्हणतात. पण, लवकर रूट कॅनल केल्यास दातांचा भाग वाचवता येतो. दुखणे, सुज किंवा पू येत असल्यास दात बरे होण्यास वेळ लागू शकतो.
२) हिरडीतून रक्तस्त्राव होत असल्यास ब्रश करू नये, असे काही जण म्हणतात. परंतु, प्लाक आणि अन्नकण यांमुळे हिरड्यांमध्ये सळसळ होते. रक्त येते. ब्रश तसेच प्लॉसिंगने ही घाण निघू शकते. मात्र, हिरड्यांतून रक्त येणे थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जावे.
३) दात काढल्यास नजर कमी होते, असा एक गैरसमज अनेकांमध्ये आहे. मात्र, दात काढल्याने डोळ्यांवर कोणताही परिणाम होत नाही. याचा दृष्टीशी थेट संबंथ नाही.
४) दात स्वच्छ केल्याने दात झिजतात किंवा सैल होतात, असेही काहीजण म्हणतात. परंतु, दातांचे स्केलिंग केल्याने दातांवरील केवळ कठीण झालेली घाण, डाग अथवा टारटर काढले जाते. दात नंतर पूर्ववत होतात.
५) दुधाचे दात वयाच्या ६ ते १२ वर्षांच्या कालावधीत विविध टप्प्यांत पडतात. मागील दाढ लवकर पडल्यास जबड्याची वाढ व्यवस्थित होत नाही. लांबी कमी राहते. नंतरच्या पक्क्या दातांची गर्दी होते. ते वेडेवाकडे होऊ शकतात. अकाली पडलेल्या समोरील दातांमुळे बोलण्याच्या शब्दरचनेच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो.
६) गर्भधारणेदरम्यान सर्व प्रकारचे दंतोपचार थांबवावेत, असे काहीजण सांगतात. गर्भारपणादरम्यान अँटिबायोटिक्स टाळावेत. दाताच्या डॉक्टरांना गर्भधारणेबद्दल माहिती देऊन उपचार करण्याच निर्णय ते घेऊ शकतात.
७) नियमित फॉलोअप भेटी आणि वेळेवरील उपचार यामुळे दातांचा इलाज विनावेदना अथवा अल्प वेदनांत होऊ शकतो.
८) फक्त लहान वयातच दात सरळ करता येतात, असे म्हटले जाते. परंतु, दात कोणत्याही वयात सरळ करता येऊ शकतात.
९) दात शुभ्र केल्याने कमकुवत होतात, असे म्हणतात. पण तज्ज्ञांकडे हे केल्यास काहीही नुकसान होत नाही. काही रुग्णांमध्ये दातांची अल्पकालीन संवेदना होते. मात्र, उपचारानंतर फ्लोरिडेटेड वॉर्निशच्या वापराने हा त्रासही बंद होतो.