आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या शरीरामध्ये मूत्रपिंडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर मूत्रपिंड हे कार्य यशस्वीपणे करू शकले नाही, तर त्याचा शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सहसा लक्षणे दिसत नसल्यामुळे मूत्रपिंडाचा विकार अनेक जणांमध्ये दुर्लक्षितच राहतो. वेगवेगळ्या मोठ्या आजारांपासून दूर राहायचे असेल, तर मूत्रपिंडाची काळजी घेणे आवश्यक आहे.
मूत्रपिंडाचे कार्य- मूत्रपिंड शरीरात उत्सर्जन यंत्रणा म्हणून काम करत असते. मूत्रपिंड शरीरातील पाण्याचे नियंत्रण, आम्ल आणि क्षारांचे संतुलन, संप्रेरकाची निर्मिती, रक्तदाब नियंत्रण, हाडांचे आरोग्य, हिमोग्लोबिनच्या निर्मितीत साह्य अशी अनेक कार्ये पार पाडत असते.
मूत्रपिंड विकाराची लक्षणे – हळूहळू थकवा येणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, रात्री लघवीला जाण्यासाठी उठावे लागणे, सारखे लघवीला जावे लागणे अशी लक्षणे या रुग्णांमध्ये असतात. पण ही लक्षणे इतर आजारांमध्येही दिसू शकतात. त्यामुळे बऱ्याचदा मूत्रपिंडाच्या विकाराकडे दुर्लक्ष होऊ शकते. काही जणांमध्ये अंगावर व चेहऱ्यावर थोडी सूज येणे, लघवीचा रंग लाल दिसणे, कोरड्या उलट्या होणे अशी लक्षणेही दिसतात. ही सगळी लक्षणे मूत्रपिंड विकारांची असू शकतात व तपासण्याद्वारे त्याची खात्री करता येते.
ह्या लोकांना अधिक धोका – मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण , ज्यांना मूत्रपिंडाला पूर्वी जंतूसंसर्ग होऊन गेला आहे किंवा मूतखडा होता असे रुग्ण, मूत्रपिंड विकाराची आनुवंशिकता असलेले रुग्ण या सर्वाना मूत्रपिंड विकार होण्याचा धोका अधिक असतो.