आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या डोके वर काढतात. विशेषत: सांध्यांचे जुने आजार, त्वचेचे आजार, फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या, आदी तोंड वर काढतात. नेहमी दुखत असलेल्या शरिराच्या एखाद्या अवयवाचे दुखणे थंडीत असह्य होते. थंडीतील अशाच काही समस्या आणि त्यांवरचे उपाय आपण जाणून घेणार आहोत.
* तळपायाच्या भेगा
हिवाळ्यात हा त्रास होतो. कधी-कधी भेगांतून रक्तही येते. वेदना असह्य होतात. आहारात साजूक तुप, दूध असे स्निग्ध पदार्थ वाढवावेत. लोणचे, मिरचीचा ठेचा तसेच अतितिखट पदार्थ टाळावेत. रात्री जागरण करू नये. रात्री झोपताना भेगांना साजूक तूप लावावे. चंदन, लाख, ज्येष्ठमध त्याचप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी तेल भेगांवर लावावीत. ज्येष्ठमध साजूक तुपात टाकून प्यायल्याने भेगांचा त्रास कमी होतो.
* त्वचेची समस्या
हिवाळ्यात त्वचेतल्या तैलग्रंथी निष्क्रीय होऊन त्वचा निस्तेज आणि रखरखीत होते. सुरकुत्या, त्वचा फाटणे, ओठ फुटणे अशा तक्रारी वाढतात. यासाठी घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन लावा. अंघोळीनंतर खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर करा. आहारात मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलड घ्या. रात्री झोपताना साय किंवा तूपात चंदन टाकून त्वचेला मालिश करा.
* सांधेदुखी
सांध्यांना थंड हवा लागू देऊ नका. पायांना, हातांना मोजे वापरा. थंड पाण्यात काम करणे टाळा. शिळे आणि थंड अन्न खाऊ नका. बटाटे, उसळी, ब्रेड तसेच बेकरीचे पदार्थ, डाळी आणि डाळींच्या पीठाचे पदार्थ टाळा. मांसाहार पूर्णत: टाळा करा. गरम, ताजे अन्न घ्यावे. कोमट पाणी प्या. सांधेदुखीचा त्रास असल्यास अतिश्रम टाळा. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करा. वैद्यकीय सल्ल्याने विविध प्रकारचे गुग्गुळ, दशमुळांचा काढा तसेच इतर वनौषधींचा उपयोग करा.
* दमा
अशा व्यक्तींनी दही, ताक, दूध, मिठाई, थंड पाणी, आईसक्रीम, कोल्ड टी, कोल्ड कॉफी तसेच शितपेये टाळावीत. कोमट पाणी प्यावे. सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण घ्यावे. रात्री झोपताना तसेच सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून शेक घ्या. यामुळे कफ मोकळा होतो. २ ते ३ कप पाणी घेऊन त्यात तुळस, अडुळशाची प्रत्येकी दोन पाने टाकावी आणि एक कप काढा राहील अशा रितीने उकळून कोमट काढा रात्री झोपताना किंवा सकाळी घ्यावा. त्याचप्रमाणे कोबी पाण्यात टाकून गरम करून त्याची वाफ घ्यावी. तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारती ही आसने करावीत. च्यवनप्राश, सितोपलादी चूर्ण तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे.