आरोग्यनामा ऑनलाइन – राज्यामध्ये स्वाइन फ्लूच्या मृत्यूच्या प्रमाणात मे महिन्यापासून घट झाली आहे. मागील २५ दिवसांमध्ये एकही रुग्ण दगावलेला नाही. राज्यात केवळ दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असून आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
राज्यात फेब्रुवारी- मार्च महिन्यात थंडीचे वातावरण होते. हे हवामान स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक असल्याने या दोन महिन्यांमध्ये रुग्णसंख्येत आणि रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली होती. या वर्षात स्वाईन फ्लूने जानेवारी २६, फेब्रुवारी ४९, मार्च ६३, एप्रिल ३५ तर मे महिन्यात ४ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. १० मे नंतर राज्यात स्वाइन फ्लूमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. जानेवारी ते मे अखेर स्वाइन फ्लूमुळे १७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यभरात सुमारे ११ लाख ७५ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. सुमारे २१ हजार संशयित रुग्णांना ऑसेलटॅमिविर गोळ्या देण्यात आल्या. सध्या १०५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.