आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळा मनाला आनंद देणारा असला तरी याच काळात अनेक रोग पसरतात. त्यापासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी काही उपाय करता येऊ शकतात. आहार, विहार व निद्रा, स्वच्छता याकडे लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात कावीळ, हिवताप, मलेरिया, पोटाचे विकार, सर्दी, खोकला, पडसे, संधिवातासह त्वचा विकारात वाढ होते. या दिवसांत डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यू, हिवताप, हत्तीपाय या आजारांचाही प्रादुर्भाव होतो.
पावसाळ्यात केळी, दही, ताक यांचे सेवन कमी करावे. साबूदाणा तसेच बटाटा व वांगी पचायला जड असल्याने ती खाऊ नयेत. जास्त तिखट, तेलकट व आंबट पदार्थ टाळावेत. शिळे अन्न खाणे टाळावे. डास चावल्यानंतर अंगावर दाट चट्टा उठल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. तसेच वातदोष असल्यास संयम बाळगून व्यायाम करावा. पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे. उघड्यावरील पदार्थ खावूच नये. पाणी उकळून प्यावे. या काळात व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. गॅस्ट्रो, डायरिया असे आजार होतात.
पावसाळ्यात खोकल्याचा त्रास जास्त होतो. खोकला आल्यास चमचाभर आल्याचा रस तेवढ्याच मधात टाकून चाटण करावे. सर्दी झाल्यास २ कप पाण्यात तुळशीची १० ते १२ पाने, आले, गूळ उकळून घेऊन प्यावे. पायांना भेगा, चिरा असल्यास तिळाच्या तेलाने पाय चोळावेत. आणि जखम असेल तर हळद, कडुनिंबाची पाने, तीळ, तेल यांची पेस्ट लावावी. पचनशक्ती वाढीसाठी जिरे तव्यावर भाजून त्याची बारीक पूड करून गरम पाण्यातून १ चिमूट घ्यावी. पित्तदोष असणारांनी पचायला हलके जेवण घ्यावे. झोपताना दूध प्यावे. अतिसाराचा त्रास झाल्यास दूध न घातलेल्या काळ्या चहात अर्धा लिंबू पिळून घ्यावे.
या हवामानात शरीराची रोग प्रतिकार क्षमता सक्षम राहिली पाहिजे. यासाठी पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे. गहू आणि तांदळापासून तयार केलेला हलका आहार घ्यावा. पालेभाज्यांच्या सूपला प्राधान्य द्यावे. डासांपासून रक्षण करण्यासाठी दारे, खिडक्यांना जाळ्या लावाव्यात. कडुलिंबाची पाने जाळल्याने कृमी, कीटक, डास मरतात. पाण्याचे डबके साठू देऊ नये. घरात जास्त दिवस पाण्याचा साठा करू नये.