आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ‘सिकलसेल’ हा रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. प्रामुख्याने बालकांमध्ये व क्वचितप्रसंगी वयस्कांमध्येही हा रोग आढळतो. सिकलसेल हा एका पिढीतून पुढच्या पिढीत जाणारा रक्ताशी संबंधित आजार आहे.
सिकलसेल म्हणजे काय
गर्भधारणेच्या वेळीच रक्तातील हिमोग्लोबीनच्या रचनेत बदल होऊन रक्तातील गोल लाल पेशी कोयत्याच्या आकाराच्या होतात.तांबड्या रक्तपेशी ज्या चकतीसारख्या असतात, त्या विळ्यासारख्या अर्धवक्राकार आणि ठिसूळ होतात. त्यांच्या आकारामुळे आणि ठिसूळपणाने या पेशींचे धारदार तुकडे होतात. त्यामुळे या पेशी रक्तवाहिन्यांतून सहज प्रवाहित होत नाहीत. परिणामी शरीराला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे रुग्णाला अंग दुखण्याचा त्रास होऊ लागतो. या वेदना सौम्य, मध्यम, तीव्र किंवा अतितीव्र असू शकतात.
निरोगी मनुष्याच्या रक्तपेशी १२० दिवस जिवंत असतात. परंतु, सिकलसेलग्रस्त व्यक्तीच्या रक्तपेशी केवळ ३० ते ४० दिवसच जिवंत असतात. पीडित रुग्ण आणि वाहक रुग्ण अशा दोन प्रकारांत या आजारांचे रुग्ण आढळतात.
सिकलसेल आजाराची लक्षणे
या रोगाने ग्रस्त झालेल्या रुग्णाला लवकर थकवा येतो.
हातपायांवर सूज येते , सांधे सुजतात व दुखतात. तीव्र वेदना होतात.
अंगात सातत्याने बारीक ताप राहतो. सर्दी-खोकला वाढतो. शरीरात प्राणवायूच्या कमतरतेमुळे रुग्णाला तीव्र वेदना होतात.
चेह-यावर अजिबात तेज दिसत नाही. डोळ्यांत पिवळसरपणा दिसतो.
रुग्णात तांबड्या पेशींचे आयुर्मान घटल्याने यांचे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी होऊन त्याला रक्ताक्षयाचा त्रास वाढतो.
हिमोग्लोबीनचे प्रमाण सहा टक्क्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे रुग्णाला बाहेरून रक्त द्यावे लागते. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन तो अशक्त होतो.
रुग्णाला कावीळ होण्याची शक्यता असते.
उपचार
या आजारावर कोणताही रामबाण उपाय नाही. अस्थिमज्जारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्रांटद्वारे हा आजार बऱ्याच अंशी घालवता येतो.
आजाराच्या लक्षणानुसार डॉक्टर उपचार करतात. रुग्णाला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून प्रतिजैविके रोज एकदा किंवा दोनदा गरजेनुसार देतात. यात फॉलिक अॅसिड आणि खनिजयुक्त जीवनसत्त्वांच्या गोळ्यांचा समावेश असतो.