मुंबई : आरोग्यनामा ऑनलाइन – मुंबईतील पालिका रुग्णालयात तृतीयपंथी लोकांवर उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा अशी मागणी तृतीयपंथी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांनी केली आहे. तृतीयपंथी रूग्णालयात गेल्यावर काहीवेळा डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी तयार होत नाहीत. सुविधा उपलब्ध असूनही अनेकदा तृतीपथींवर उपचार केले जात नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली.
केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी तृतीयपंथी लोकांच्या आयुष्यावर लिहिलेले Gender and equality या नाटकाचा एक प्रयोग सादर करण्यात आला. या कार्यक्रमात तृतीयपंथी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी गौरी सावंत म्हणाल्या, रुग्णालयात जायला मला भिती वाटायची. पण केईएम रुग्णालयाने आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिल्याने मनातील भिती दूर झाली आहे. यावरून डॉक्टरांचा तृतीयपंथी लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे.
लिंग शस्त्रक्रिया ही पालिका रुग्णालयात केली जाते. यावरून आम्हाला मुलगा न राहता मुलगी बनण्याचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे पालिका रुग्णालयावर खुप विश्वास आहे. आम्हाला देवानंतर डॉक्टरच सर्वकाही आहेत. त्यामुळे आम्हाला फक्त डॉक्टरांच्या प्रेमाची गरज आहे. तृतीयपंथी लोकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अद्याप बदललेला नाही. तृतीयपंथी हा समाजाचा एक घटक आहे आणि त्यांना जगण्याचा अधिकार आहे. यासाठी पालिका रूग्णालयात तृतीयपंथी लोकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष असणं गरजेचं आहे.
तृतीयपंथीयासाठी पालिका रूग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. पण अनेकदा या लोकांवर उपचार कसे करावेत हेच डॉक्टरांना माहित नसल्याने केईएम रुग्णालयाने तृतीयपंथी लोकांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. तृतीयपंथी आणि डॉक्टर यांच्यामधील दरी नष्ट व्हावी हा यामागील उद्देश आहे, असे केईएम रुग्णालयातील ऑक्युपेशन थेरपीस्ट डॉ. सुशांत पगारे म्हणाले.