आरोग्यनामा ऑनलाईन टीम– मानवी मनगटाच्या मर्यादा असतात. त्यांना केवळ सहा प्रकारे वळविता येते. मात्र, रोबोटिक सर्जरीदरम्यान रोबोटिक्स आर्म ३६० अंशात वळू शकतो. शिवाय मानवी हात थरथर कापत असतो. हातांच्या या सर्व मर्यादांवर मात करून बारा पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह मानवी शरीराच्या कुठल्याही भागात रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती मध्य भारतातील एकमेव कर्करोग व रोबोटिक्स शल्यचिकित्सक असलेले डॉ अभिनव देशपांडे यांनी दिली.
प्रोफेसर्स कॉलनी मित्रमंडळ, नागपूरच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. एकेकाळचे प्रिंटिंग व पॅकेजिंग क्षेत्रातील प्रतिथयश व्यावसायिक जगमोहनदासजी किनारीवाला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या व्याख्यानात ‘क्या यंत्रमानव शरीर में जाकर सर्जरी कर सकता है?’ या विषयावर प्रभावी व अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीत अभिनव देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. युद्ध मैदानावरील रुग्णांपर्यंत डॉक्टर प्रत्यक्ष पोहोचू शकत नसल्याने दूरवरून उपचार कसा होईल, याची चर्चा सुरू असताना अमेरिकेमध्ये रोबोटिक्स सर्जरीचा जन्म झाला. नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्येसुद्धा रोबोटिक्स सर्जरी सुरू होण्याची शक्यता असल्याचे डॉ. अभिनव यांनी सांगितले.त्यांनी उपस्थिताना रोबोटिक्स सर्जरी कशी होते, याचे दृकश्राव्य पद्धतीने प्रात्यक्षिकसुद्धा दाखविले. श्रोत्यांच्या विविध शंकांचे रीतसर समाधान केले. शिवाय मानवी मेंदूची जागा कोणीही घेऊ शकत नाही, हेसुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन वैजयंती दीक्षित यांनी केले. तसेच जगमोहनदास किनारीवाला यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला. पराग पांढरीपांडे यांनी वक्त्यांचे स्वागत केले. श्यामभाई किनारीवाला यांनी स्मृतिभेट प्रदान केली. सजोल किनारीवाला हिने आभार मानले. प्रणव हळदे, संदीप तिजारे यांनी आयोजनाच्या यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.