आरोग्यनामा ऑनलाईन – २०११ साली माजी गृह आणि कामगारमंत्री सतीश पेडणेकर यांचा तोंडाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. पेडणेकर यांच्या कुटुंबियांवर त्यांच्या निधनाने दु:खाचा डोंगर कोसळला. ज्या परिस्थितीतून गेलो ती परिस्थिती कुणाच्याही वाट्याला येऊ नये, यासाठी पेडणेकर यांच्या पत्नी सुमित्रा यांनी तंबाखू विरोधी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत त्यांनी भारतीय तंबाखू कंपनीला (आयटीसी) पत्र पाठवून तंबाखू उत्पादन थांबवण्याची विनंती केली आहे.
तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि उत्पादनांवर सरकारने बंदी घातली असतानाही काही कंपन्या उत्पादन करत असल्याचे पेडणेकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तंबाखूशी संबंधित रोगामुळे दरवर्षी देशात दहा लाख लोकांचा मृत्यू होतो. तर सिगारेट सेवन करणारी प्रत्येकी तिसर्या व्यक्तीचा मृत्यू होतो आहे. तंबाखू सेवनामुळे कर्करूग्णांमध्ये वाढ होते आहे. देशात होणार्या सर्वाधिक मृत्यूचे कारण कर्करोग आहे. या कर्करोगाची लागण होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत, असे सुमित्रा पेडणेकर यांनी म्हटले आहे. यासाठी सुमित्रा पेडणेकर यांनी भारतीय तंबाखू कंपनी (आयटीसी) आणि अन्य तंबाखू उत्पादन कंपन्यांना पत्र पाठवून उत्पादन न करण्याची विनंती केली आहे. लोकांच्या जीवावर बेतेल असा व्यवसाय बंद करा, असे त्यांनी म्हटले आहे. मर्चंड ऑफ डेथ अशी मोहिम पेडणेकर यांनी सुरू केली आहे. या मोहितून त्या जनजागृती करणार आहेत.