आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ग्रामीण भागातील लोकांना मानसिक आरोग्य आणि आजाराची माहिती करून देण्यासाठी राज्यातील १५० मानसोपचार तज्ज्ञांनी गाव तेथे मानसोपचार ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. ७ एप्रिल २०१९ रोजी मोहिमेला सुरूवात झाली असून आतार्यंत २२ जिल्ह्यांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांनी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले आहे. १ आणि २ जून रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत मानसोपचारतज्ज्ञांनी एकाच दिवशी, एकाच वेळी मानसिक आजाराबद्दल जनजागृती केली.
या मोहीमेबाबत माहिती देताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलन बालकृष्णन म्हणाले, ग्रामीण भागात मानसिक आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील मानसोपचार तज्ज्ञ या मोहीमेच्य निमित्ताने एकत्र आले होते. कर्तव्य भावनेतून डॉक्टरांनी हा उपक्रम राबवला आहे. घरोघरी जाऊन डॉक्टरांनी मानसिक आजाराबद्दल माहिती दिली. तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मिडियांच्या माध्यमातून ही जागरूकता पसरण्यात आलीये. या मोहिमेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर औरंगाबादमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख म्हणाले, मानसिक आजाराबद्दल ग्रामीण भागात आजही अनेक गैरसमज आहेत.
मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने हे लोक उपचारांपासून वंचित राहतात. म्हणून मोहीम राबविण्यात आली आहे. सुरूवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवला. आता दोन टप्प्यात राबवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ५० मानसोपचार तज्ज्ञांनी मिळून २२ जिल्ह्यांमध्ये नैराश्य एक आजार या विषयावर कार्यक्रम राबवला. १५० मानसोपचार तज्ज्ञ या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.