आरोग्यनामा ऑनलाइन टीम : मोलमजूरीसाठी गुजरातहून मुंबईत आलेला एका तरूणाचा मुंबईतील अंधेरी स्थानकात अपघात झाला. रेल्वेच्या या अपघातात त्याचा उजवा हात चाकाखाली आल्याने धडावेगळा झाला. या अपघातानंतर तरूणास तातडीने उपचारसाठी कुपर रूग्णालयात हलविण्यात आले. त्याचा हात डॉ. नितीन घाग आणि त्यांच्या टीमने प्लॅस्टिक सर्जरी करून पुन्हा जोडला.आता महिनाभराच्या उपचारानंतर त्याच्या हाताची हळूहळू हालचाल होऊ लागली आहे.
हा २८ वर्षीय तरूण गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणारा असून त्याचे नाव धर्मेंद्र आहे. या तरुणाला अतिशय गंभीर परिस्थितीत रुग्णालयात आणण्यात आले होते. अपघातात हात-पाय तुटल्यानंतर रक्तप्रवाह थांबतो आणि त्यामुळे तुटलेला अवयव निकामी होऊ लागतो. त्यामुळे रुग्णावर तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याने आवश्यक त्या चाचण्या करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शस्त्रक्रियेत हाताच्या तुटलेल्या रक्तवाहिन्या पुन्हा जोडण्यात आल्या.
याशिवाय हाड आणि त्वचा जोडणे इत्यादी बाबी करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेला ७ तास लागले. या तरुणावर महिनाभर रुग्णालयात उपचार सुरू होते.धर्मेंद्र याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आता त्यास डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे कुपर रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जन डॉ. नितीन घाग यांनी सांगितले.शस्त्रक्रियेनंतर सुमारे महिनाभराच्या उपचारानंतर धर्मेंद्रचा संवेदनाहीन झालेला हात पूर्वपदावर येत असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. साधारणपणे पुढील वर्षभरात धर्मेंद्रला पूर्वीप्रमाणे स्वतःच्या हाताने काम करता येईल, असे कुपर रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले.