आरोग्यनामा ऑनलाईन टीम- उत्तम आरोग्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी सेंद्रीय पध्दतीने पिकवलेले धान्य,भाजीपाला, फळे हितकारक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ. स्वागत तोडकर यांनी केले. शेतकऱ्यांनी सेंद्रीय पध्दतीने शेती केली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असा दावाही तोडकर यांनी केला. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमीक महासंघ, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना व पारनेर तालुका ई.पी.एस ९५ निवृत्ती वेतनधारक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हसत खेळत विविध आजारांवर घरगुती उपचार’ या विषयावर प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ.स्वागत तोडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
ह.भ.प. सोपानकाका औटी, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष बलभीम कुबडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, आनंदराव वायकर, एम.के.शिंदे, माधवराव गाडीलकर, साखर कामगार नेते शिवाजीराव औटी, निवृत्ती मते आदी उपस्थित होते. अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांच्या उत्पादनात रासायनिक खते, किटकनाशके यांचा अमर्याद वापर केला जातो. त्याचे दुष्परीणाम मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. कँन्सर सारख्या जिवघेण्या आजाराच्या रुग्णांमधे मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. इतर घातक आजारही बळावत चालले आहेत. मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे थांबवण्यासाठी सेंद्रीय शेती उत्पादनांचा वापर हा रामबाण उपाय असल्याचे तोडकर म्हणाले.
आधुनिक, रासायनिक खते व किटकनाशके वापरुन घेतलेल्या शेतीमालाच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत सेंद्रीय शेतीचा उत्पादन खर्च अवघा दहा टक्के आहे. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी होत असल्याने पर्यायाने नफ्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार नाहीत व आत्महत्या थांबतील असा दावा डॉ.तोडकर यांनी केला. सर्दी, ताप या सारख्या किरकोळ आजारांपासून मधुमेह, कावीळ, थायरॉईड अश्या विविध आजारांवरील घरगुती निसर्गोपचारांबाबत डॉ. तोडकर यांनी मार्गदर्शन केले.