आरोग्यानामा ऑनलाइन टीम – मधुमेहाचे प्रमाण भारतात मोठ्याप्रमाणात वाढत असून एक आव्हान निर्माण झाले आहे. यासाठी जनजागृती, उपचार आणि नियंत्रण याबाबत असलेली कमतरता लक्षात घेता सुरुवातीलाच प्रतिबंध आणि तपासणी यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. धक्कादायक म्हणजे भारतातील ५० टक्के नागरिकांना आपल्याला मधुमेह आहे, हे माहितीच नसते. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया, हार्वर्ड टी. ए. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, मद्रास डायबेटिज रिसर्च फाऊंडेशन, हिल्डबर्ग इन्स्टिट्युट ऑफ ग्लोबल हेल्थ, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंघम आणि युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंगनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही गंभीर बाब समोर आली आहे.
संशोधकांनी २०१५-१६ च्या नॅशनल हेल्थ अँड फॅमिली सव्र्हेच्या आधारे घेतला. या अभ्यासात देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशील १५ ते ४९ वयोगटाच्या ७,२९,८२९ नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. या संशोधनातून संशोधकांना असे आढळून आले की, १५ ते ४९ वयगोटातील मधुमेहग्रस्तांना त्यांना हायपरटेंशन असल्याचे माहिती नाही.
दमण आणि दिवमध्ये जनजागृती, उपचार आणि नियंत्रणाचे प्रमाण अनुक्रमे ५.५ टक्के, ५.३ टक्के आणि २.१ टक्के आहे. तर मेघालयात जनजागृती, उपचार आणि नियंत्रणाचे प्रमाण सर्वात जास्त अनुक्रमे ६९.६ टक्के, ६०.९ टक्के आणि ५३.७ टक्के आहे. ३० मुख्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचा दर ३० टक्के आहे. ५२.५ टक्के लोकांना माहिती आहे की त्यांना मधुमेह आहे. १० पैकी ४ म्हणजे ४०.५ टक्के रूग्ण सध्या औषधे घेत आहेत. ४ पैकी एका व्यक्तीचा म्हणजे २०.४ टक्के लोकांचा मधुमेह नियंत्रणात आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्ती, पुरुष आणि गरीब, कमी शिकलेल्या लोकांमध्ये आवश्यक ती काळजी घेण्याचे प्रमाण कमी दिसून आले. १५ ते ४९ वयोगटातील फक्त २०.८ टक्के मधुमेहग्रस्त पुरुष आणि २९.६ टक्के मधुमेहग्रस्त महिलांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आहे.