आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केरळात पुन्हा एकदा निपाहचा रूग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे केरळात भीतीचे वातावरण आहे. तसेच इतर राज्यांनी याचा धसका घेतला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या तरी निपाह व्हायरसचा धोका नाही. मात्र, नागरिकांनी तसेच रूग्णालयांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आरोग्य विभागाने केली आहे.
गेल्या वर्षी केरळमध्ये निपाह व्हायरसने १७ जणांचा बळी घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा केरळात निपाहने बाधित रूग्ण सापडल्याने येथील आरोग्य प्रशासन अॅलर्ट झाले आहे. निपाहचा संसर्ग रोखण्यासाठी येथे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात निपाहची भीती सध्या तरी नसल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे. याबाबत राज्याच्या संसर्गजन्य नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अद्याप निपाहचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे कोणताही हाय-अलर्ट जारी केलेला नाही. मात्र, नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आजारपण अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
निपाहला प्रतिबंध करण्यासाठी झाडावरून जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत. तसचे या आजाराची संशयित लक्षणे दिसून आल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या आजारावर कुठल्याही प्रकारचे औषध नसल्याने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
निपाहची लक्षणे
* ताप अधिक काळ राहणे
* डोकेदुखी
* सतत उलट्या होणे
* श्वास घेण्यास त्रास होणे
* न्यूरोलॉजिकल समस्या
* अंगदुखी
* मेंदूज्वर