आरोग्यनामा ऑनसाईन – आजच्या धकाधकीच्या अन धावपळीच्या युगात मनुष्याला वेळ कमी पडत आहे. कामाचा व्यापामुळे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. यातून अनेक आजार जडतात. यातून सुटका होण्यासाठी सर्वांनी नियमित व्यायाम करून शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन डॉ. राजीव जोशी यांनी केले. भारतीय जैन संघटना आणि पुण्याच्या संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जैन भवनात आयोजित हाड आणि मणक्यांच्या मोफत रोगनिदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष हस्तिमल बंब होते.
या वेळी डॉ. शुभम शहा, डॉ. विनायक, डॉ. पाटणी, जिल्हाध्यक्ष अशोक संचेती, किरण रायबागकर, महिला अध्यक्षा ऊर्मिला पिपाडा उपस्थित होते. प्रारंभी मंजू कोटेचा, प्रेमलता मोदी यांनी नमस्कार णमोकार महामंत्र सादर केला. हस्तिमल बंब म्हणाले की, शिबिराचा लाभ विशेष करून ग्रामीण रुग्णांना झाला. ग्रामीण भागातूनच जास्त रुग्ण आले होते. साधारण कुटुंबातील व्यक्तींना मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या दवाखान्यात जाणे शक्य होत नाही. आर्थिक दृष्ट्या परवडतदेखील नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने डॉ. जोशी यांना बोलावण्यात आले. यात २२८ रुग्णांची फिजिओथेरपी करून मोफत उपचार करण्यात आले. सूत्रसंचालन ॲड. अभय सेठिया, तर शिखरचंद लोहाडे यांनी आभार मानले. शिबिरासाठी ॲड. अभय सेठिया, पवन सेठिया, नरेंद्र मोदी, ताराचंद कुचेरिया, धनराज जैन, संंतोष पहाडे, डॉ. धरमचंद गादिया, श्रीकांत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.