आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिशचाही धोका काही वर्षांपासून निर्माण झाला आहे. मागणील काही वर्षांमध्ये गणपती विसर्जनावेळी जेलीफिश चावल्याने काही जण जखमी झाले होते. अशा घटना घडल्यास तातडीची उपाययोजना म्हणून यंदा मुंबई महापालिका रुग्णालयात आणि मुंबईच्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्याची मागणी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
शितल म्हात्रे यांनी आपल्या मागणीबाबत म्हटले आहे की, पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईच्य किनारपट्टीावर जेलीफिश येतात. गणपती विसर्जनापर्यंत ते येथे असल्याने वर्षांपासून मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण असते. मागील दोन, तीन वर्षांपासून हे सुरू आहे. यावर महापालिका प्रशासन समुद्रात न उतरण्याचा सल्ला देते. पण यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेलीफिशने दंश केलेल्यांना त्वरित उपचार मिळण्यासाठी महापालिका रुग्णालयात आणि किनारपट्ट्यांवर उपचारासाठी विशेष कक्षाची स्थापना करावी.
जेलीफिशला प्रतिबंध करणारा औषधांचा साठा पालिका रुग्णालयात, समुद्रकिनारी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर पावसाळ्याआधी ब्लू बटन, पावसाळ्यात ब्लू बॉटल आणि पाऊस ओसरल्यावर बॉक्स जेलीफिश किनारपट्टीवर येतात. याविषयी माहिती देण्यात आली पाहिजे. यासाठीच स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे. तशी मागणी त्यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे.