आरोग्यनामा ऑनलाइन – स्वाईन फ्लूमुळे राज्यात होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या वाढत आहे. स्वाईन फ्लूवर असलेल्या नव्या औषधाची भारतात चाचणी व्हावी आणि त्यानंतर ते औषध राज्यात उपलब्ध व्हावे, यासाठी राज्याच्या संसर्गजन्य विभागाने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला पत्र पाठवून मागणी केली आहे. स्वाईन फ्लूवर Pelamivir आणि Baloxavir ही नवी औषधे आली आहेत. यूके आणि जपानमध्ये या औषधांचा शोध लागला आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला हे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांना पत्राद्वारे स्वाईन फ्लूच्या औषधाला वेगळा पर्याय म्हणून या दोन नवीन औषधांचे मूल्यांकन करावे असे सांगितले आहे. राज्यात स्वाईन फ्लूमुळे बळी जाणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला या नव्या औषधांची चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे. एखाद्या औषधाची चाचणी होऊन ते बाजारात येण्याच्या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो.
त्यानंतर अन्न आणि औषधे प्रशासनाने मंजूर केल्यानंतर ही औषधे बाजारात विक्रीसाठी येतात. त्यामुळे ही एक खूप मोठी प्रक्रिया आहे, असे राज्याच्या संसर्गजन्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे म्हणाले. तर संसर्गजन्य आजार समितीचे टेक्निकल हेड सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, ही नवी औषधं भारतात उपलब्ध नाहीत. ज्या व्यक्तींना अधिक ताप आहे शिवाय ज्यांना टॅमी फ्लूने आराम मिळत नाही अशा रूग्णांना ही नवी औषधे उपयोगी ठरतील. यासाठी या दोन नवीन औषधांच्या मूल्यांकनासाठी पत्र लिहिले आहे.