आरोग्यनामा ऑनलाइन टीम – माणसाला दु:खही विसरण्यास लावण्याचे सार्मथ्य संगीतात आहे. प्रत्येकाच्या दु:खाचे स्वरूप हे वेगवेगळे असते. या दु:ख चक्रातून कुणाचीही सुटका होत नसली तरी ते विसरणे आणि त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. अशावेळी संगीत ऐकले तर दु:ख विसरणे शक्य आहे. ऐवढे सार्मथ संगीतात आहे. संगीत ऐकणारा दु:ख विसरून स्वरातून समाधीकडे जाऊ शकतो. प्राचीन काळापासून वैद्यकीय क्षेत्रात संगीत चिकित्सेला महत्त्व आहे. संगीत आणि शरीरस्वास्थ याचा परस्पर संबंध आहे. इजिप्तमध्ये पुरातन काळात बाळाच्या जन्मावेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी संगीत साधनेचा वापर केला जात होता, असे पुरावे उपलब्ध आहेत.
भारतीय संगीत शास्त्रात रागचिकित्सा या पुस्तकात विविध राग आणि त्याचा आजारांवरील परिणाम यावर विस्तगत माहिती देण्यात आली आहे. रागदरबारी या रागामुळे तणाव कमी होतो असे सांगण्यात आले आहे. या रागाची निर्मिती तानसेनने बादशहा अकबरासाठी केली होती. दिवसभराच्या ताणतणावातून आराम मिळवण्यासाठी बादशहा अकबर हा राग ऐकत असल्याचे म्हटले आहे. रागभूपाळी व राग तोडीमुळे उच्च रक्तदाब कमी होतो. राग मालकंस, राग आसावरी रक्तदाबाच्या व्याधीवर उपयोगी ठरतो. हृदयविकार असणाऱ्यांसाठी राग चंद्रकंस, ताणतणावावर राग तिलककामोद दुर्गा, कलावती, शांत झोप येण्यासाठी राग बिहाग व राग बहार फायदेशीर ठरतात.
संगीताचा उपयोग आधुनिक वैद्यकशास्त्रातसुद्धा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नुकतेच कोल्हापूर येथील डॉक्टरांनी गर्भवती महिला आणि गर्भातील बाळावर संगीताचा कोणता परिणाम होतो, याचा शोध घेण्यासाठी संशोधन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. लवकरच हे संशोधन करण्यात येणार आहे. तसेच कॅन्सर, हृदयविकार, सिझेरियन किंवा इतर शस्त्रक्रियेवेळी संगीताचा किती उपयोगी होऊ शकतो यावर सुद्धा काही संशोधक संशोधन करत आहेत. कॅन्सरसारख्या जीवघेण्या व्याधीमध्ये केमोथेरपीवेळी संगीत ऐकल्यास मळमळ, उलटी यासारखे साइड इफेक्ट टाळता येतात, असा दावा केला जातो.
संगीताच्या लयबद्ध नादामुळे उजव्या व डाव्या मेंदूमधील सुसूत्रीकरण होण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्तीला संगीतातील विशिष्ट ताल-लय आवडेल असे नाही. प्रत्येक व्यक्तीची अभिरुची भिन्न-भिन्न असते. तदनुसार सर्व प्रकारच्या संगीताचे कार्यक्रम आयोजित करावे लागतात. प्रत्येक व्यक्तीला शास्त्रीय संगीतामुळे प्रसन्न, उत्साही वाटते. मानवाप्रमाणे पशुपक्षीही संगीताचा आनंद घेतात, असे आढळून आले आहे. संगीताच्या श्रवणाने वनस्पतीची वाढ जलद व जास्त होते, असे निसर्ग शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोगाने सिद्ध केले आहे. एखाद्या गायन वादनाच्या मैफलीत श्रोता सुरांशी इतका एकरूप होतो की, त्याची नादब्रम्हात समाधी लागते. त्याला स्थलकालाचे भान राहत नाही. एवढी ताकद संगीतामध्ये आहे.