पोलीसनामा ऑनलाइन टीम : बे्रनडेड रूग्णावर अवयवदान शस्त्रक्रिया झाल्यानंतर उपलब्ध अवयव गरजूंपर्यंत वेळेत पोहचवणे खूपच कठीण काम असते. ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून अशा वेळी रूग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली जाते. मात्र शहरांमधील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रूग्णांना घेऊन जाणारी रूग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकते. आणि रूग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे आता लवकर यल्लो कॉरिडोरच्या माध्यमातून अशा रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली जाणार आहे. अशाप्रकारे रुग्णाला रुग्णालयापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी यल्लो कॉरिडोर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला पुढील उपचारासाठी डॉक्टर पालिकेच्या केईएम, नायर किंवा शीव रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. अशावेळी अपघातग्रस्त, गर्भवती महिला, हृदयविकार किंवा स्ट्रोकचा झटका आलेल्या रुग्णांना अन्य रुग्णालयात नेऊन तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा मुंबईच्या ट्राफिकमध्ये रुग्णवाहिका अडकते. साधारणतः दीड ते दोन तास ट्राफिकमध्ये राहिल्याने उपचार वेळेत होत नाहीत. अशात रुग्णाची प्रकृती अधिक बिघडू शकते. यासाठी अवयवदानासाठी राबवण्यात येणाऱ्या ग्रीन कॉरिडोर प्रमाणे मुंबईत रुग्णांसाठी यल्लो कॉरिडोर तयार करण्यात यावा, अशी मागणी वाहतूक पोलिसांकडे करण्यात आली आहे. ग्रीन कॉरिडोरप्रमाणे सारखीच उपाययोजना करून रुग्णालासुद्धा काही मिनिटात दुसऱ्या रुग्णालयात पोहोचवता येऊ शकते. याकरता एखाद्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची गरज असल्यास यल्लो कॉरिडोर योजना राबवली पाहिजे.
जेणेकरून डॉक्टरांनी वाहतूक पोलिसांना याबाबत सूचना केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने एक कर्मचारी त्या रुग्णवाहिकेबरोबर पाठवावा. यामुळे रुग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतील, असे राजावाडी रुग्णालयातील दक्षता कमिटीचे सदस्य प्रकाश वाणी म्हणाले.
दरम्यान, यल्लो कॉरिडोरच्या या मागणीबाबत माहिती देताना मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त शहाजी उमप म्हणाले की, मुंबईत रुग्णांसाठी यल्लो कॉरिडोर सुरू करण्यासंदर्भात लेखी मागणी आली आहे. रुग्णांना योग्य वेळेत अन्य रुग्णालयात पोहोचवून त्याचा जीव वाचवता यावा याकरता यल्लो कॉरिडोरची संकल्पना अतिशय चांगली आहे. गरजू रुग्णांसाठी ही योजना अंमलात आणता येईल का? याबाबत विचारविनिमय सुरू आहे. लवकरच योग्य निर्णय घेऊ, असे उमप म्हणाले.