पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – दिवसेंदिवस मधुमेहासारख्या आजाराचे वाढत्या प्रमाणामुळे भारत ही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. वयस्कर व्यक्तींबरोबर, तरुणांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि बालमधुमेहींची वाढती संख्या लक्षात घेता जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. सकाळची पोष्टीक न्याहारी ही ब-यार आजारांना प्रतिबंध करत असून याविषयी नागरिकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. जागतिक मधुमेह दिन आणि बालदिनाचे औचित्य साधत पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाच्या वतीने पौष्टीक न्याहारीविषयी लहानांपासून ते थोरांपर्यंत जनजागृती करण्यात आली.
एनर्जी ड्रींकचे सेवन करणे हे आरोग्यासाठी घातक असून मुलांचा पोषक आहार देणे गरजेचे आहे असे तज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले. कोणतेही नॉन अल्कोहोलीक ड्रिंक, ज्यामध्ये कॅफिन, टॉरिन (एक अमिनो असिड) आणि व्हिटॅमिन व बाकी इतर घटक असतात अशा ड्रिंकला एनर्जी ड्रिंक म्हणतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्यामुळे एनर्जी ड्रिंकची सवय किंवा अतिरेक हा आपल्या मेंदूवर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम करू शकतो.
निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे अतिशय महत्त्वाचे असून खाण्यापिण्याच्या योग्य सवयी या प्रत्येक व्यक्तीला आजारांपासून दूर राहण्यास मदत करते. दिवसाची सुरुवात पोषक न्याहारीने करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे असे पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे सल्लागार फिजीशियन डॉ संजय नगरकर यांनी सांगितले. आमचा ठाम विश्वास आहे की जेव्हा मुलांमध्ये जनजागृती केली जाते तेव्हा ती सहजपणे त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचते. जेव्हा मुले प्रौढांना एनर्जी ड्रिंक, फास्ट फूड सेवनाच्या हानिकारक प्रभावांबद्दल सल्ला देण्यास सुरुवात करतात तेव्हा ते सहजपणे या पदार्थांचे सेवन करणे टाळले जाते. पोषण आणि निरोगी अन्नाचे मूल्य, संतुलित आहार आणि हानीकारक पदार्थांमधील फरक आणि घरगुती खाद्यपदार्थाचे मूल्य वाढवण्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही डॉ. नगरकर यांनी सांगितले.
हल्ली बालमधुमेहींचे प्रमाण वर्षागणिक वाढल्याचे दिसून येते. देशात दरवर्षी 13,000 मुलांना मधुमेहाचे निदान होते. या मुलांमध्ये सामान्यत: टाइप 1 प्रकारचा मधुमेह आढळतो. परंतु बदलती जीवनशैली आणि वाढत्या तणावामुळे 16 वर्षाखालील मुलांना टाइप 2 मधुमेह देखील निदान होत असल्याचे दिसून येते.
मुलांना उर्जा मिळावी पालकांनी त्यांना उत्तेजित पेय न देता संतुलित आहार देणे आवश्यक आहे. लहान मुले तसेच किशोरवयीन मुलांना योग्य आहाराच्या सवयी लावणे आवश्यक आहे. स्पोर्ट्स ड्रिंक व्हिटॅमिन आणि मिनरल्सने भरलेले असतात, परंतु मोठ्या प्रमाणात साखरही असते. त्यांना चांगले चव देण्यासाठी आवश्यक आहे, परंतु त्याचा आरोग्यावर घातक प्रभाव पडतो. दीर्घ कालावधीत जास्त प्रमाणात साखर यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढणे होऊ शकते. तज्ञ डॉक्टरांच्या मते लहान मुलं आणि किशोयवयीन मुलांनी एनर्जी ड्रिंकचे सेवन करू नये. शारीरीक उर्जेसाठी मुलांनी समतोल आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. पुरेशी झोप आणि समतोल आहार हे उर्जेचे प्रमुख स्रोत आहेत. जीवनशैलीत अचूक बदल केल्यास प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता येऊ शकते. उर्जा मिळविण्यासाठी एनर्जी ड्रिंकचे सेवन न करता नैसर्गीकरित्या उर्जा मिळविण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे.