आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्त्रियांची मासिक पाळी हा आता न बोलण्याचा विषय राहिलेला नाही. आरोग्याच्या दृष्टीनेही महिन्यातील हे चार दिवस खरे तर महत्त्वपूर्ण असतात. मात्र या दिवसात शारीरिक व मानसिक स्तरावर होत असलेल्या बदलांमुळे स्त्रियांना ताण येतो व त्याचा साहजिक परिणाम या चार दिवसांकडे दुर्लक्ष करण्याकडे होतो. मात्र त्यामुळे जंतुसंसर्गापासून कर्करोगापर्यंतच्या आजारांना आमंत्रण मिळते. स्त्रियांचे आरोग्य चांगले राखले जावे यासाठी मासिक पाळी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे दर महिन्याला येणारी अडचण असा दृष्टिकोन न ठेवता मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखता येईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
१) सध्या धकाधकीची जीवनशैली आणि जाहिरातींचे कौशल्य यामुळे बाजारात मिळणाऱ्या सॅनिटरी पॅडचा वापर करण्याकडे स्त्रियांचा अधिक कल आहे. मात्र कमी गुणवत्ता असलेल्या पॅडच्या वापरामुळे जंतुसंसर्ग, योनीमार्गातून पांढरे द्रव जाणे, खाज येणे यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे स्त्रियांनी चांगली गुणवत्ता असलेले पॅड वापरावेत.
२) रक्तस्रावाच्या प्रमाणानुसार दिवसातून किमान ३ ते ५ वेळा पॅड बदलावेत. बऱ्याचदा स्त्रिया एकच पॅड दिवसभर वापरतात याचा स्त्रियांच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो.
३) सुकलेले रक्त व घाम यामुळे योनीमार्गात संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
४) स्वच्छतेबाबतीत मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पाण्याची उपलब्धता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पॅड वापरण्याची परिस्थिती नसेल तर घरगुती कापडांचे पॅडही वापरले जाऊ शकतात. यासाठी वापरात येणाऱ्या कापडाला शिवण, बटण नसावे याची खात्री करून घ्यावी. त्याशिवाय कापड स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात वाळत घालावे. कापडावरील जंतू उन्हाने मरतात.
५) पावसाळ्यात आणि हिवाळ्यात उन्हामध्ये कापड घालणे शक्य नसल्यास या कापडांना इस्त्री केली तरी चालू शकते. त्याबरोबरच महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या कापडाचा स्वत:चा वेगळा संच असावा. इतर कोणाचेही पाळीचे कापड वापरू नये.