आरोग्यनामा ऑनलाईन – राज्यात स्वाईन फ्लूने पुन्हा डोकं वर काढलं आहे. हवामानातील बदलामुळे राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लू पसरत आहे. १ जानेवारी, २०१९ पासून आतापर्यंत ३० रुग्णांचा मृत्यू झाला तर ५६२ जणांना स्वाईन फ्लू असल्याचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एकुण ३० मृतांपैकी सर्वाधिक मृत रूग्ण हे नागपुरातील आहेत. येथे स्वाईन फ्लूमुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने ६ जणांचा बळी घेतला आहे. स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्हयात वेगवेगळ्या पद्धतीने स्वाईन फ्लूबाबत जनजागृती केली जाते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन मुलांना स्वाईल फ्लू संबंधातील माहिती देण्यात येते आहे. डॉक्टरांनाही याची माहिती देऊन ती रूग्णांपर्यंत पोहोचवण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय प्रसारमाध्यमातून लोकांना खबरदारी घेण्याबाबत सांगण्यात येतं आहे.
ताप, घसा खवखवणं, अंगदुखी, थकवा, अतिसार, उलट्या, अचानक तोल जाणं, श्वसनाचा त्रास, मुलांची त्वचा निळसर होणं, अंगावर पुरळ येणं ही स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. स्वाईन फ्लू टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा, खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करा, नाक आणि तोंडावर मास्क बांधा, हात वारंवार साबणाने धुवा, भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्यावा, अशा प्रकारे काळजी घेतल्यास या आजाराला दूर ठेवता येऊ शकते.