आरोग्यनामा ऑनलाईन टीम – राज्याच्या आरोग्य विभागाने कुपोषणाबाबत दिलेल्या आकडेवारीतून धक्कादायक चित्र समोर आले आहे. या आकडीवारीनुसार २०१५ ते २०१९ या ४ वर्षांत ९,६६४ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे. यातील ७,२२८ बालके जन्मानंतर वर्षभराच्या आत दगावली. तर १ ते ५ वर्ष वयोगटातील २,४३६ बालकांचा समावेश आहे. मेळघाट आणि पालघर मध्ये सर्वाधिक बालमृत्यूंची नोंद झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कुषोपण झालेल्या बालमृत्यूबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१५-१६ मध्ये ५,३५८, २०१६-१७ मध्ये ५,६३६, २०१७-१८ मध्ये ४,३२२ तर २०१८-१९ या कालावधीत ४,०१२ बालकांचा मृत्यू झाला आहे. मेळघाट, नंदूरबार आणि गडचिरोली या दुर्गम भागात कुपोषित बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असले तरी यश येत नसल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्यानेच बालकांचे मृत्यू होत असल्याचे या क्षेत्रात काम करणारे मान्यवर सांगत आहेत. राज्य सरकारने विविध नवीन योजना आणण्यापेक्षा सध्याच्या योजनाच प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत, असे तज्ज्ञ सांगतात.
दहा वर्षांपूर्वी गर्भवती मातांना पौष्टिक आहार मिळत नव्हता. पण आता सरकारने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मूल ६ वर्षांचे होईपर्यंत त्यांना काय खायला द्यावे, हेच पालकांना कळत नाही. यासाठी पालकांना माहिती देणे गरजेचे आहे. कुपोषित बालकांना शोधण्यासाठी सरकारने मोहीम आखल्यास मुलांवर तातडीने उपचार होऊ शकतात. तसेच यामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करता येईल, असे पिडियाटिक्स नेटवर्क संस्थेचे संस्थापक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अतीश लद्दाद यांनी सांगितले.