आरोग्यानामा ऑनलाइन टीम – वजन वाढताना ते हळूहळूच वाढते. चुकीच्या आहार पद्धतीमुळे वजन वाढते. त्याचबरोबर शरीराला व्यायाम मिळत नसेल, एकाच जागी बसून काम करावे लागत असेल तर वजन वाढते. वजन एका दिवसात अथवा एका रात्री वाढत नाही. त्यामुळे वजन कमी करतानाही ते दोन-चार दिवसात कमी होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. शिवाय, अतिशय घाईघाईत कमी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. आहारात कॅलरीचे प्रमाण कमी केल्यास शारीरिक कार्यक्षमता मंदावते आणि थोडीशी मेहनत केली तरी शरीर थकून जाते. यामुळे खूप अशक्तपणा जाणवतो. कडक आहारनियमन आणि त्यामुळे होणारे नुकसान याविषयी आपण जाणून घेऊयात. मेद आणि साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असणे म्हणजेच स्ट्रिक्ट डाएट प्लॅन म्हणजेच कडक आहारनियमन योजना होय. असा आहार वजन नियंत्रित किंवा कमी करण्यासाठी घेतला जातो. अशा आहारामध्ये विशेष काळजी घेणे खूप गरजेचे ठरते.
स्ट्रिक्ट डाएटमध्ये शीतपेये, चिप्स, डबाबंद खाद्यपदार्थ किंवा ज्यूस इत्यादी पथ्य पाळले जाते. हे खाद्यपदार्थ दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक मीठ, साखर आणि रसायनांचा वापर करतात. असे पदार्थ वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. तसेच सर्व प्रकारच्या जंक फूडपासूनही दूर राहावे लागते. हे पदार्थ दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी त्यातसुद्धा मीठ किंवा साखरेचा वापर केला जातो. जेवणात मेदाचा वापरही खूप कमी प्रमाणात केला जातो. एक हजार किंवा त्यापेक्षा कमी उष्मांक असलेल्या आहारास क्रॅश डाएट म्हणतात. झोपतानाही शरीराला उष्मांकाची आवश्यकता भासते. क्रॅश डाएटमुळे शरीराला पुरेशी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सचा मिळत नाहीत.परिणामी शरीर अशक्त होते. पुरुषांनी १६०० पेक्षा कमी आणि महिलांनी १४०० पेक्षा कमी उष्मांक घेऊ नये. त्यामुळे कमी उष्मांकाचा आहार असंतुलित होतो आणि शरीरात विविध पोषक द्रव्यांच्या कमतरतेसाठी कारणीभूत ठरू शकतो.
प्रत्येकाच्या शरीरात उष्मांकाची गरज वय, लिंग आणि वजनानुसार ठरते. कमी कालावधीत लवकर वजन घटवण्यासाठी असलेल्या स्ट्रिक्ट डाएटमध्ये अनेक पोषक द्रव्यांचा समावेश नसतो. हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तसेच यामध्ये ठरावीक प्रमाणात उष्मांकाचा समावेश केल्यास वजन कमी होते. मात्र त्यामुळे अशक्तपणा येतो. कमी कालावधीत लवकर वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट घेण्याबरोबरच जास्त व्यायाम करणे चुकीचे आहे. अशावेळी शरीराला आहाराचा आधार मिळत नाही आणि जमा असलेल्या मेदाचा ऊज्रेच्या रूपात वापर होतो. यामुळे शरीर अशक्त होते. अशा प्रकारांऐवजी वजन घटवण्यासाठी ३०-४० मिनिटांचा कार्डियो व्यायाम करावा आणि २५ मिनिटांची वेट ट्रेनिंग घ्यावी. कार्डियो व्यायाम केल्यामुळे स्नायू ढिले पडतात. त्यामुळे स्नायूंच्या बळकटीसाठी वेट ट्रेनिंग घेतली जाते.